श्रीगोंदा( जनता आवाज वृत्तसेवा ) :- राज्याच्या विविध भागात लग्नाळू तरुणांचे लग्न लावून लग्नानंतर सोने, चांदीचा ऐवज घेऊन पोबारा करणारी टोळी श्रीगोंदा पोलिसांनी जेरबंद केली आहे. या टोळीने राज्याच्या विविध भागात एकाच महिलेचे अनेकांच्या बरोबर लग्न लावले असल्याचे समोर आले आहे.
श्रीगोंदा पोलिसांत याबाबत गुन्हा दाखल होता. त्यानुसार पोलिसांनी सातजणांना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता त्यांना ११ दिवस पोलीस कोठडी मिळाली आहे.
श्रीगोंदा पोलिसांत नितीन अशोक उगले (रा. मुंगूसगाव) यांनी २८ जून रोजी फिर्याद दिली होती. यातील आरोपींनी संगनमत करत एका मध्यस्थीमार्फत फिर्यादीसोबत लग्न करून संसार करण्याचे ठरवत, त्या बदल्यात २ लाख १५ हजार रु. देण्याचे मान्य करत यवतमाळ येथून चारचाकी घेऊन बोलावून घेत एका महिलेसोबत लग्न लावून दिले. त्यानंतर संबंधित महिला दुसरे लग्न करून पळून जात असताना फिर्यादीचे आईने आरोपी महिलेला पकडून ठेवले.
यावेळी आरोपी महिलेने फिर्यादीच्या आईच्या डोळ्यात मिरचीपूड टाकत, शिवीगाळ करत मारहाण केली. यावेळी अन्य आरोपींनी देखील फिर्यादीच्या आईला मारहाण केली.
याप्रकरणी गौतम पाटील, आशा गौतम पाटील, सिमरन गौतम पाटील रा. चोरंबा, ता. घाटंजी, जि. यवतमाळ, शेख शाहरुख शेख फरीद, दीपक पाडुरंग देशमुख, अर्जुन रामराव पाटील, सचिन बलदेव राठोड (रा. अरणी जि. यवतमाळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास ज्ञानेश्वर भोसले यांनी केला.
तसेच तांत्रिक तपासा आधारे आरोपी आशा गौतम पाटील, सिमरन पाटील, शेख शाहरुख शेख फरीद, दीपक पाडुरंग देशमुख, अर्जुन रामराव पाटील, सचिन बलदेव राठोड उर्फ राज रामराव राठोड, युवराज नामदेव जाधव (सर्व रा. यवतमाळ) यांना अटक करत फसवणूक केलेली रोख रक्कम व त्यांनी गुन्ह्यात वापरलेल्या चारचाकी गाड्या असा १३ लाख ७८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपींना न्यायालयात उभे केले असता ११ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.