श्रीरामपूर दि.१५ प्रतिनिधी:-राज्यातील बहुतेक जिल्ह्यात वाळू विक्री केंद्र कार्यान्वित करण्याची प्रक्रीया वेगाने सुरू झाली असून,सामान्य नागरीकांसह घरकुलांना वाळूची उपलब्धता होत आहे. सर्व अडचणी दूर झाल्याने काही दिवसात वाळू धोरणाची अंमलबजावणी जनतेच्या सहकार्याने यशस्वी होईल असा विश्वास महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
राज्यातील बहुतेक जिल्ह्यात वाळू विक्री केंद्र कार्यान्वित -महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील
श्रीरामपूर येथे महसूल अधिकार्याकडून नायगाव येथील वाळू विक्री केंद्राच्या संदर्भात आढावा घेतला पंधरा हजार ब्राॅस वाळू इथे उपलब्ध झाली असून आतापर्यत २३७ ब्राॅस वाळू घरकुलांना मोफत उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे सांगून मंत्री विखे पाटील म्हणाले की, सुरूवातीला काही तांत्रिक अडचणी आल्या अधिकारी कर्मचारी यांच्या दृष्टीने नवा विषय होता.परंतू आता सर्व अडथळे दूर झाले आहेत.या धोरणासाठी तयार केलेले अॅप्स आणि टोल फ्री क्रमांकही सुरू झाले असून, धोरणाच्या अंमलबजावणीत येत्या पंधरा दिवसात अधिक सुसूत्रता येईल असे मंत्री विखे पाटील यांनी स्पष्ट केले.
काही ठिकाणी झालेल्या विरोधावर भाष्य करताना मंत्री विखे पाटील म्हणाले की या नागरीकांचा धोरणाला विरोध नाही.यापुर्वी वाळू माफीयांकडून गावाला त्रास झाला या व्यवसायाने गुन्हेगारी वाढली, तो पुन्हा नको ही त्यांची भावना आहे.जनतेच्या भावनेच्या विरोधात जावून शासन काही करणार नाही.परंतू अमळनेर येथील ग्रामस्थांच्या आंदोलनात राजकीय हस्तक्षेपही झाला हे सुध्दा दुर्लक्षित करता येणार नाही.या ग्रामस्थांशी मी स्वता जावून चर्चा करणार असल्याचे नमूद करून इथे वाळू केंद्र झाले नाहीतर या भागातील इतर नागरीकांना अधिक दूरवरून वाळू आणावी लागेल त्यांचा वाहतूक खर्चही वाढेल ही दुसरी बाजू सुध्दा विचारात घेण्याची गरज मंत्र्यांनी बोलून दाखविली.
जनतेच्या हितासाठी हे धोरण तयार केले असल्याने जनतेच्या सहकार्याने यशस्वी होईल असा विश्वास व्यक्त करतानाच गेली अनेक वर्षे वाळू व्यवसाय माफीयांच्या वर्चस्वाखाली होता.शासकीय यंत्रणेलाही या व्यवसायाने पोखरले होते.आता कायद्याच्या चौकटीत धोरणाची अंमलबजावणी होणार आहे.यापुर्वी सर्व बेकायदेशीर सुरू होते.आता जलसंपदा विभागालाही यामध्ये समाविष्ट करून घेण्यात आल्याने नव्या वाळू धोरणातून काहीतरी चांगले घडविण्याचे प्रयत्न जनतेच्या मनातील सरकारचे आहेत. येणार्या काही दिवसात या धोरणाची यशस्वीता चांगल्या पध्दतीने समोर येईल असे मंत्री विखे पाटील म्हणाले.
महाविकास आघाडीच्या झालेल्या बैठकीवर बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की कर्नाटक राज्यात ज्यांना आपल्या पक्षाच्या उमेदवारांचे डिपाॅझीट वाचवता आले नाही ते काय तिसरा पर्याय देणार ॽत्यांच्या वज्रमुठीला केव्हाच तडे गेले आहेत आता तेच एकमेकांना मूठ मारतील आशी खोचक प्रतिक्रीया त्यांनी व्यक्त केली.



