संगमनेर ( जनता आवाज वृत्तसेवा ):- हिवरगाव पावसा येथील बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावलेल्या ओवी सचिन गडाख या चिमुकलीच्या कुटुंबीयांचे नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे यांनी सांत्वन केले असून वन विभागाने बिबट्याच्या बंदोबस्तासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.
बुधवारी सायंकाळी ओवीची आई आपल्या शेतामध्ये जनावरांसाठी चारा काढत असताना चिमुकली ओवी बांधावर बसली होती. तितक्यात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केला. आणि ओवीला घायाळ केले. यावेळी आईने आरडाओरडा करत ओवीची सुटका करण्यासाठी खूप प्रयत्न केला.परंतु या चिमुकल्या ओवीला जखमा जास्त झाल्याने तिला तातडीने दवाखान्यात हलवण्यात आले मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले यामुळे संपूर्ण परिसरामध्ये मोठी शोककळा पसरली.
हे वृत्त समजतात विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीने सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊन मदत केली. परंतु ओवीला वाचवण्यात यश आले नाही.
काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात हे विधानसभा अधिवेशन सुरू असल्याने मुंबईत आहे मात्र या घटनेचे वृत्त समजतात त्यांनी दुःख व्यक्त केले. यानंतर काल सौ.दुर्गाताई तांबे यांनी तातडीने गडाख कुटुंबीयांची भेट घेऊन सर्वांचे सांत्वन केले. तसेच उपस्थित वन अधिकाऱ्यांना या बिबट्याच्या बंदोबस्तासाठी आपण प्रभावी उपाययोजना केल्या पाहिजेत यासाठी सूचना दिल्या. या हल्ल्यामुळे या परिसरातील लहानगे मुले घाबरली असून या मुलांना पालकांनी धीर द्यावा असे आवाहनही केले. याप्रसंगी डॉ. प्रमोद पावसे, सोमनाथ भालेराव तसेच वन विभागाचे अधिकारी सचिन लोंढे आणि सह विविध मान्यवर उपस्थित होते.



