नगर( जनता आवाज वृत्तसेवा ) :- अहमदनगर पोलीस विभागातील स्थानिक गुन्हे शाखा ही गुन्हे रोखण्यासाठी की फक्त खंडणी वसुल करण्यासाठी आहे, असा प्रश्न उपस्थित करून ही शाखा जिल्ह्यात गुंडगिरी पाठीशी घालून खंडणी वसुल करीत असल्याचे खा. निलेश लंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच गृहमंत्री देवेेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात नमुद केले आहे. खा. लंके यांच्या उपोषणादरम्यान प्राप्त झालेल्या तक्रारींच्या प्रतीही त्यांनी पत्रासोबत जोडल्या आहेत.
खा. लंके यांनी पत्रात नमुद केले आहे की, स्थानिक गुन्हे शाखेतील भ्रष्टाचाराबाबत पत्रान्वये अवगत करण्यात येवूनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने दि. २२ जुलैपासून पोलिस अधिक्षक कार्यालयासमोर उपोषणास बसलेलो आहोत. उपोषणादरम्यान पोलीस प्रशासनातील काही अधिकारी, कर्मचारी तसेच पोलीसांच्या वर्तणुकीसंदर्भात गंभीर तक्रारी समोर आल्या आल्याचे लंके यांनी म्हटले आहे.
गंगापुर जिल्हा औरंगाबाद येथील सोनार दुकानदारास गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन त्यांना विनाक्रमांकाच्या गाडीमधून जबरदस्तीने उचलून आणण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल, दत्तात्रेय गव्हाणे, रवींद्र कर्डीले, संदिप दरंदले व पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी १७० ग्रॅम सोने जबरदस्तीने वसुल केले.
शेवगाव येथील सराफाच्या दुकानात बनावट आरोपी आणून सोने विकत घेतल्याचा आरोप करून कर्मचारी भाऊसाहेब काळे, रविंद्र कर्डीले व संतोष लोंढे यांनी दमदाटी व खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची भिती दाखवून ५० ग्रॅम सोने व ५० हजार रूपये वसुल करण्यात आले.
गंगापुर येथील तिरूपती ज्वेलर्स या दुकानदाराने चोरीची वस्तू घेतल्याचा आरोप करून दत्तात्रय गव्हाणे याने ९० हजार रूपये बळजबरीने घेतले.
नगरमधील प्लॅस्टिक विक्री करणाऱ्या व्यवसायीकाला दरोड्याच्या गुन्ह्यात बअटक करायची आहे असे सांगून रवी कर्डीले, शिवाजी ढाकणे, दिनेश आहेर व इतर पाच ते सहा जणांनी दोरीने बांधून पट्ट्याने मारहाण करण्यात आली. चोरीचे सोने घेत असल्याचा आरोप करून त्यांच्या पत्नीकडून २ लाख ११ हजार ७१२ रूपयांचे दागिने घेण्यात आले.
शेवगाव तालुक्यातील वडूले खुर्द येथील भुसा व किराणा माल व्यवसायीकांकडून स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी खोट्या गुन्ह्यात अडविण्याची धमकी देऊन ५ लाख रूपये वसुल करण्यात आले.
गंगापुर येथील सदभावे ज्वेलर्स यांच्यावर चोरीचे सोने घेतल्याचा आरोप करून त्यांच्या दुकानातील १ किलो ३५ ग्रॅम सोने, २ किलो चांदी व ३ लाख रूपये उकळण्यात आले.
नेवासा तालुक्यातील सिध्दीविनायक ज्वेलर्स यांना दुकानातील दागिने चोरीचे आहेत असे सांगून मारहाण करण्यात आली. त्यांच्या दुकानातील ४०० ग्रॅम सोन्याचे दागिने व अर्धा किलो चांदीचे दागिने ताब्यात घेऊन पैशांची मागणी करण्यात आली.
गंगापुर येथील सुर्वणकारास खोट्या गुन्ह्याची धमकी देऊन ५ ग्रॅम सोन्याची मागणी करण्यात आली. २२९ ग्रॅम सोने घेउन प्रकरण मिटविण्यात आल्याचे सांगण्यात आले.