अहमदनगर, दि.४ मे (जिमाका वृत्तसेवा) – जिल्हास्तरीय खरीप हंगाम आढावा बैठक ६ मे रोजी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना लागणारी बियाणे, खते व किटकनाशके याबाबत कृषी विभागाने केलेल्या नियोजनाचा आढावा घेण्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी प्रसिध्दपत्रकाद्वारे दिली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी १२ वाजता ही बैठक पार पडणार आहे. खरीप हंगाम सन २०२३- २४ साठी शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार निविष्ठांचा वेळेत व वाजवी दरामध्ये पुरवठा होणेचे दृष्टीने कृषी विभागाने सूक्ष्म नियोजन केलेले आहे.
शेतकऱ्यांची कमी दर्जाच्या निविष्ठांमुळे फसवणूक होऊ नये. यासाठी जिल्हास्तरावर १ व प्रत्येक तालुका स्तरावर १ अशी एकुण १५ भरारी पथके जिल्हयामध्ये कार्यरत करणेत आलेली आहेत. भरारी पथकामार्फत निविष्ठा विक्रेत्यांची अचानक तपासणी केली जाणार आहे. बोगस निविष्ठा व जादा दराने निविष्ठांची विक्री केल्यास संबंधित विक्रेत्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक टळेल व अनधिकृतरित्या विक्री होणाऱ्या बोगस बियाणे व खते विक्रीला लगाम घालण्यास मदत होईल.
जिल्हास्तरावर तसेच तालुकास्तरावर निविष्ठा उपलब्धता व तक्रार निवारण कक्षांची स्थापना करणेत आलेली आहे. तसेच प्रत्येक तालुका स्तरावर तक्रार निवारण समिती कार्यरत करणेत आलेली आहे. जिल्हयामधील शेतकऱ्यांची निविष्ठा उपलब्धतेमध्ये अडचणी उदभवल्यास तक्रार निवारण कक्षाशी संपर्क करावा. असे जाहीर आवाहन ही श्री.बोराळे यांनी केले आहे.



