श्रीरामपूर (तालुका प्रतिनिधी):-श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर येथे घरगुती वादातून पतीने पत्नीला साखळीच्या सहाय्याने बाजेला बांधून डोक्यात वार करत हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अत्यंत क्रूरतेने पतीने पत्नीची हत्या केल्याच्या या घटनेने नाऊर परिसरासह तालुका हादरून गेला आहे.
निर्मला शांताराम देसाई (वय ४२) असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव असून पतीला श्रीरामपूर तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.याप्रकरणी जयश्री शरद देसाई (रा. त्रिभुवन वस्ती, नवीन नायगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, नाऊर ता.श्रीरामपूर येथे काल सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली.मृत निर्मला देसाई व तिचा पती शांताराम खंडेराव देसाई हे दोघे येथे राहत होते. त्यांना एक विवाहित मुलगा असून तो पुणे येथे तर मुलगी अकोले येथे राहतात.
पती-पत्नीमध्ये संशयावरून नेहमीच वाद होत होते. आजही (ता.२७) वादातूनच शांताराम याने पत्नी निर्मलाचे पाय घरातील बाजेला साखळीच्या सहाय्याने बांधून तिला लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. तसेच पत्नीला झालेल्या जखमांवर पतीने मीठही चोळले. त्यानंतर कपड्याच्या सहाय्याने गळा आवळून तिला जीवे ठार मारले. यावेळी फिर्यादी जयश्री देसाई व नातेवाईक मदतीला धावले असता त्यांनाही दमदाटी करण्यात आली.निर्मला यांच्या डोक्यात कुठल्यातरी टणक वस्तूने वार करून तिला गंभीररित्या जखमी केले. त्यानंतर पुन्हा निर्मला यांचा गळा आवळून जीवे ठार मारले असल्याचा प्राथमिक अंदाज साखर कामगार रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी व्यक्त केला आहे.अत्यंत क्रूरतेने केल्या गेलेल्या या हत्येच्या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस उप अधीक्षक संदीप मिटके व श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी निर्मला देसाई यांचा मृतदेह येथील साखर कामगार रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवून दिला होता. याप्रकरणी पती शांताराम देसाई यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.



