शिर्डी (जनता आवाज वृत्तसेवा):-शिर्डी शहर आणि परीसराच्या विकासा बरोबरच महीलांचा सन्मान आणि सुरक्षिततेला प्राधान्य दिले आहे. नव्या औद्योगिक वसाहती मधून युवकांच्या रोजगार निर्मितीचे उद्दीष्ट्य पूर्ण होईल असा विश्वास महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
गोकुळाष्टमी निमित्त दतात्रय कोते यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या महीला सन्मान सोहळ्यात मंत्री विखे पाटील बोलत होते.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महीलांना प्रातिनिधीक स्वरुपात प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. माजी नगराध्यक्ष कैलास कोते, ज्ञानेश्वर गोंदकर, अशोक पवार, नितीन कोते, विलास कोते, रमेश गोंदकर, निलेश कोते, संग्राम कोते, विकास गोंदकर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणून त्याची यशस्वी अंमलबजावणी केली आहे. जिल्ह्यातील आठ लाख महीला योजनेसाठी पात्र ठरल्या असून अजूनही नोंदणी सुरू असलेल्या बहीणींना योजनेचा लाभ मिळवून देण्यास महायुती सरकार कटीबध्द असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.
शिर्डी शहराच्या विकासाला निधीची उपलब्धता सातत्याने करून दिल्यामुळे शहराचे बदलते स्वरुप आपल्याला पाहायला मिळते. शहराची लोकसंख्या वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येचा विचार करूनच विकासाची पायाभरणी शहरात होत असल्याचे त्यांनी सांगितले.
शर्डी तिर्थस्थान आंतरराष्ट्रीय झाले आहे. येणार्या भाविकांसाठी सुध्दा सुविधा आणि सुरक्षा देण्याची जबाबदारी असल्याने विकास प्रक्रीया राबविताना आता महीलांचा सन्मान करताना त्यांच्या सुरक्षिततेला आपण प्राधान्य दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
शिर्डी येथे नव्याने विकासित होणारी औद्योगिक वसाहत मोठी उपलब्धी या भागातील युवकांसाठी आहे. सुमारे एक हजार कोटी रुपयांच्या डिफेन्स क्लस्टरच्या प्रकल्पाला मिळालेली मंजूरी पाहाता परीसरातील दोन हजार युवकांना रोजगाराची संधी मिळणार असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दतात्रय कोते यांनी केले. कैलास कोते यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विराट प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमास उपस्थित राहून मंत्री विखे पाटील युवकांना शुभेच्छा दिल्या.