शिर्डी (जनता आवाज वृत्तसेवा):-विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर भारतीय जनता पक्षाने निवडणूक व्यवस्थापन समिती जाहीर केली असून, या समितीमध्ये महसूल तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांची लाभार्थी संपर्क समितीचे प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे.
अगामी विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाने तयार केलेल्या व्यवस्थापन समितीमध्ये माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांची व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली असून, प्रमुख समित्यांची जबाबदारी अन्य नेत्यांवर सोपविण्यात आली आहे.
यामध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे विविध योजनांच्या लाभार्थींच्या संपर्क समितीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची यशस्वी अंमलबजावणी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वच योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे झाली आहे. अनेक योजनांच्या यशस्वीतेमध्ये अहिल्यानगर जिल्हा हा राज्यात अग्रस्थानी आहे. योजनांचा लाभ सामान्य माणसाला मिळावा म्हणून शासन आपल्या दारी तसेच महसूल सप्ताहाच्या माध्यमातून मंत्री विखे पाटील यांनी विशेष पुढाकार घेतला होता.
अगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर लाभार्थ्यांशी चांगला संपर्क व्हावा या दृष्टीने पक्षाने विशेष जबाबदारी मंत्री विखे पाटील यांच्यावर सोपविली असून, लाभार्थ्यांच्या संपर्कासाठी या समितीच्या माध्यमातून विशेष कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.




