श्रीरामपूर ( प्रतिनिधी) :- श्रीरामपूर तालुक्यातील खोकर शिवारातील एका शेतकर्याच्या वस्तीवर बिबट्याने एक कालवड फस्त केली आहे. त्यामुळे परीसरातील शेतकर्यांमध्ये भितीचे वातावरण असून या परीसरात तातडीने पिंजरा लावावा अशी मागणी शेतकर्यांकडून वनविभागाकडे केली जात आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील प्रत्येक गावातील शेतकर्यांना बिबट्याचे दर्शन नित्याचेच झालेले आहे. अनेकदा बिबट्याने शेतकर्यांवर हल्ले केल्याच्याही घटना घडल्या आहेत. त्यामुळे शेतकरी रानावनात जाताना धास्तवात आहेत.रात्री अपरात्री पिकांना पाणी भरण्यासाठी जाणे शेतकऱ्यांना जीवावर बेतल्यासारखे होते आहे. खोकर परिसरातील या बिबट्यानेही अनेक कुत्रे फस्त करून आता आपला मोर्चा दुधाळ जनावरांकडे वळविल्याचे दिसत आहे. वनविभागाकडे अनेकदा पिंजर्यांची मागणी करूनही वनविभागाकडून त्याबाबत ची कार्यवाही केली जात नसल्याने शेतकर्यांत संताप व्यक्त केला जात आहे.
खोकर – निपाणीवाडगाव रोडलगत गणपती मंदिरापासून काही अंतरावर वस्ती गट नं.231 मध्ये वस्ती करून राहत असलेले पांडूरंग नामदेव सिन्नरकर यांचे वस्तीवर शनिवार दि.15 एप्रीलच्या रात्री आठ वाजेच्या सुमारास सुरू असलेल्या वादळी वारे व विजेच्या कडकडाटा दरम्यान विज पुरवठा खंडीत झालेला असताना अंधाराचा फायदा घेत या बिबट्याने सिन्नरकर यांचे दारासमोरील गोठ्यात बांधलेल्या पंढरपूरी खिलारी जातीच्या कालवडीवर हल्ला चढवत या कालवडीला सुमारे एक हजार फुटापर्यंत जवळच्या खाडे यांचे ऊसाच्या शेतात नेवून फस्त केले.
घटनास्थळी वनविभागाचे वनक्षेत्रपाल भाऊसाहेब गाढे यांचे मार्गदर्शनाखाली वनमदतनिस गोरक्षनाथ सुरासे यांनी समक्ष भेट देत वनविभागाकडून नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले



