अहमदनगर (प्रतिनिधी):-अहमदनगर शहरात गेल्या काही दिवसापासून कायदा व सुव्यवस्था ही धोक्यात आली असून पोलिस प्रशासन हे दबावा खाली काम करत असल्याचे लक्षात आले आहे, मात्र येथून पुढे पोलिसांनी कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता आपले कर्तव्य पार पाडावे असे निर्देश खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी देवून येत्या आठवड्यात शहरातील सर्व अतिक्रमण हे पूर्ण काढण्यात येईल असा विश्वास व्यापाऱ्यांना दिला. ते पोलिस प्रशासन आणि व्यापाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते.
नगर शहरात व्यापाऱ्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्या नंतर शहरातील व्यापारी आणि पोलिस प्रशासन तसेच महानगर पालिका यांची तातडीची बैठक झाली. या बैठकीत पोलिस अधीक्षक राकेश ओला, व्यापारी महासंघाचे पदाधिकारी तसेच महानगर पालिकेचे अधिकारी यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना ते म्हणाले शहरातील वातावरण हे काही दिवसापासून बिघडत आहे, पोलिसांचे यावर कुठल्याही प्रकारचे नियंत्रण राहिले नाही ही अत्यंत गंभीर बाब असून उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी या बाबतीत आपण बोललो असून त्यांनी कडक शब्दात वरिष्ठ अधिकारी यांना सूचना दिल्या असून आपणास ही या बाबतीत जी काही ठोस पावले उचलायची असतील ती उचलण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता येथून पुढे केवळ जनतेचा विचार करून कठोरात कठोर पावले उचलण्याचा सूचना यावेळी दिल्या.
या बाबतीत पुन्हा कोणाची ही गय केली जाणार नसल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
व्यापाऱ्यांनी आपण तुमच्या पाठीशी असून व्यापाऱ्यांनी देखील व्यवसाय करत असताना कुठलाही गैर प्रकार करू नये असे सांगून जर असा प्रकार एखादा व्यापारी करत असेल तर त्याच्यावर देखील कारवाई करू अशा सक्त सूचना या वेळी दिल्या.
दरम्यान व्यापारी आणि पोलिस प्रशासन यांनी शहरातील वातावरण हे व्यवस्थित राहण्यासाठी परस्परांच्या सहकार्याने काम करू असे सांगितले.
याच बैठकीत शहरात बसविण्यात येणाऱ्या सीसीटीव्हि यंत्रणेचा आढावा आणि 112 हेल्प लाईन याचे प्रात्यक्षिक यावेळी घेण्यात आले.
बैठकीत कापड व्यापारी , पोलिस अधिकारी, कर्मचारी नागरिक यांची उपस्थिती होती.