नेवासा( जनता आवाज वृत्तसेवा) :- नेवासा तालुक्यातील मुळा आणि ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्यांची सत्ता गेल्या पन्नास वर्षांपासून प्रस्थापित कारखानदारांच्या ताब्यात असतांना आता हे दोन्ही कारखानदार एकत्र आल्यामुळे शेतकऱ्यांची कामधेनू तोट्यात चालते का असा सवाल भाजपा जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली पेचे यांनी केला आहे कारखान्यांविषयी पत्रकार परिषद घेताना ज्ञानेश्वर माऊली पेचे हे आपल्या स्थानिक भाजप नेत्यांवर देखील घसरले आणि त्यांनी त्यांना घरचा आहेर दिला.
तालुक्यातील प्रमुख विरोधक असलेले माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे व भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल लंघे हे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गप्प का आहेत असा सवाल भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे यांनी केला.जनतेचे प्रश्न न मांडणाऱ्या या नेत्यांना निवडणूक लढवायची नाही का शेतकऱ्यांसाठी हे नेते ठोस भूमिका का घेत नाही हा खरा प्रश्न आहे.
एकीकडे तालुक्याबाहेरील कारखाने उसाला ३ हजार दोनशे रुपये भाव देत असताना तालुक्यातील कारखाने मात्र दोन हजार सातशे रुपये भाव देत शेतकऱ्यांची लूट करत आहे. तसेच साखर कामगार देखील पगार अभावी अडचणीत आणला आहे कारखाना दरांच्या या विकृत मानसिकतेमुळे शेतकरी हैराण झाला असताना शेतकऱ्यांचा स्वाभिमान जागा होणे गरजेचे आहे.लवकरच साखर आयुक्तांना निवेदन देवून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आपण लढा उभारणार असल्यास त्यांनी सांगितले.
नेवासा तालुक्यातील दोन्ही कारखानदारांनी ऊस शेतकऱ्यांना हक्काचे पेमेंट जाहीर करून शेतकऱ्यांची लुट थांबवावी आणि दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी असे आवाहन त्यांनी केले
याप्रसंगी भाजपा युवा मोर्चाचे राज्य सचिव निरंजन डहाळे, शहर भाजपाचे युवानेते मनोज पारखे उपस्थित होते.



