लोणी (जनता आवाज वृत्तसेवा):- शेतकऱ्यांना विविध सेवा देण्यात प्रवरा फळे भाजीपाला सेवा सोसायटी ही अव्वल स्थानावर राहिली आहे. सेवा देण्याबरोबरच यापुढे संस्थेच्या माध्यमातून प्रक्रिया उद्योगाला चालना देण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी केले.
प्रवरा फळे भाजीपाला उत्पादक प्रक्रिया खरेदी विक्री शेतकरी सहकारी संस्था प्रवरानगरच्य ४० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सौ विखे पाटील बोलत होत्या. संस्थेच्या अध्यक्षा गीताताई थेटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या वार्षिक सर्वसाधारण सभेला सभेला ट्रक सोसायटीचे अध्यक्ष नंदूशेठ राठी, विखे पाटील कारखान्याचे माजी अध्यक्ष अण्णासाहेब कडू , प्रवरा बँकेचे संचालक राजेंद्र राऊत, पंढरीनाथ खर्डे, विखे पाटील कारखान्याचे संचालक धनंजय दळे, अॅड आप्पासाहेब दिघे, उपाध्यक्ष शालिग्राम चंद दत्ता पाटील, मकरंद गुणे, अण्णासाहेब जोशी विजय लगड, रामनाथ आहेर, उत्तमराव गाडेकर, माधवराव कडसकर, सौ वैशाली गिरमे व्यवस्थापक प्रदीप सोनवणे आदींसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनात सौ. विखे पाटील म्हणाल्या की, सहकारातून उभ्या राहीलेल्या संस्था आदर्श पद्धतीने काम करत आहेत. या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा हातभार लागत आहे. प्रवरा फळे भाजीपाला सोसायटीच्या माध्यमातून वेगवेगळ्या उपक्रमातून शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम या संस्थेच्या माध्यमातून होत आहे. संस्थेने भविष्याचा वेध घेऊन प्रक्रिया उद्योगाला चालना देण्याची गरज व्यक्त करत असताना आज दळलेल्या पिठाला मोठी मागणी आहे या व्यवसायाकडे संस्थेने लक्ष देण्याबरोबरच फळ प्रक्रिया उद्योगातून देखील आपली वेगळी ओळख निर्माण करावी अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी नंदूशेठ राठी, अण्णासाहेब कडू यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. संस्थेच्या अध्यक्षा गीताताई थेटे यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेत अहवाल वाचन केले.यावेळी विषय विषय पत्रिकेवरील सर्व विषय खेळीमेळीच्या वातावरणात मंजूर करण्यात आले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यवस्थापक प्रदीप सोनवणे यांनी तर आभार मकरंद गुणे यांनी मानले.



