संगमनेर ( जनता आवाज वृत्तसेवा):- संगमनेर विधानसभा मतदारसंघातून सलग आठ वेळेस 70,000 पेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येणारे काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा झालेला पराभव हे राज्यातील मोठे आश्चर्य असल्याचे मत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले असून माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पराभवासह राज्यातील विधानसभा निवडणूक निकालावर शंका व्यक्त केली आहे.
मुंबई येथील मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे म्हणाले की, लोकसभेच्या निवडणुकीनंतर अवघ्या चारच महिन्यात विधानसभेत असा निकाल कसा लागू शकतो. हा मोठा प्रश्न राज्यातील जनतेला पडला आहे. महाराष्ट्रातून सलग आठ वेळेस काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे 70 हजार पेक्षा जास्त मतांनी विजयी झाले. सतत काम करणारा नेता अशी त्यांची ओळख आहे. सातत्याने जनतेमध्ये राहणारे ते नेते आहेत. स्वच्छ प्रतिमा आहे. मतदारसंघात मोठ मोठी विकास कामे मार्गी लावली आहे. अगदी विरोधक सुद्धा ज्या नेतृत्वाचा आदर करतात असे बाळासाहेब थोरात यांचा पराभव होतो हे कसं शक्य आहे असे ते म्हणाले.
तर अजित पवार गटाचे लोकसभा निवडणुकीत एकच खासदार विजयी होतात आणि विधानसभेला 41 आमदार कसे निवडून यावर कुणाचातरी विश्वास बसेल का? अजित पवार, छगन भुजबळ ज्यांच्या जीवावर मोठे झाले त्या ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पक्षाला फक्त दहा जागा मिळतात हे न समजण्याच्या पलीकडची गोष्ट आहे. याशिवाय ज्या गावांमध्ये 1400 लोक राहतात त्या गावामधून राजू पाटील यांना एकही मत पडत नाही असे कसे होऊ शकते आणि म्हणून हे सर्व विधानसभेचे निकाल संशयास्पद असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमवरच त्यांनी थेट भाष्य केले असून या निकालाबाबत संपूर्ण महाराष्ट्र बोलतो आहे. आणि जनतेच्या मनामध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.
ज्या लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले ते आज सर्व सत्तेमध्ये सहभागी आहेत. लोकसभेमध्ये अशोक चव्हाण यांच्यावर आरोप झाला आणि पुढच्या आठवड्यात ते राज्यसभेचे खासदार झाले.
विविध क्षेत्रातील मान्यवरांकडूनही माजी मंत्री थोरात यांच्या पराभवाबद्दल साशंकता
राज्यातील प्रमुख नेते राज ठाकरे यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवाबाबत केलेल्या वक्तव्यासह राज्यभरात हा पराभव कोणाच्याही पचनी पडला नसून देशपातळीवरील लोकसभेतील विरोधी पक्षनेते खा.राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, श्रीमती सोनिया गांधी, खासदार प्रियंका गांधी, यांच्यासह खा.शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खा.सुप्रिया सुळे, विजय वडेट्टीवार, खासदार छत्रपती शाहू महाराज, राजेश टोपे या राजकीय नेत्यांसह,विविध,संपादक,साहित्यिक,पत्रकार,कलावंत आणि इतर क्षेत्रातील मान्यवरांसह संगमनेर तालुक्यातील अहमदनगर जिल्ह्यातील सर्व जनतेने माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पराभवाबाबाबत साशंकता आणि खंत व्यक्त केली आहे.



