राहाता, ( जनता आवाज वृत्तसेवा ):-आपल्याकडे असलेली पुरातन मंदिरं ही हिंदु धर्म आणि संस्कृतीची प्रतिकं आहेत. विकासाची प्रक्रीया राबविताना आपल्या परिसराला लाभलेला अध्यात्मिक वारसा जोपासणे हे आपले कर्तव्य आहे. भविष्यातही मंदिर परिसराच्या विकासाला निधीची कमतरता भासू देणार नाही असे आश्वासन जलसंपदा तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.
राहाता शहराचे अराध्य दैवत श्री.वीरभद्र महाराजांच्या मंदिराला ‘क’ वर्ग देवस्थानाचा दर्जा प्राप्त करुन दिल्याबद्दल मंत्री विखे पाटील यांचा विश्वस्त मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला. तसेच विरभद्र महादेव मंदिराच्या जिर्णोध्दार कार्यक्रमाच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, मुकूंदराव सदाफळ, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष साहेबराव निधाणे, अॅड.रघुनाथ बोठे, उपाध्यक्ष सचिन बोठे, माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ, सोपान सदाफळ, राजेंद्र वाबळे, सोसायटीचे चेअरमन दादासाहेब बोठे, मोहनराव सदाफळ, मोहनराव गाडेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की, वीरभद्र महाराजांच्या आशिर्वादामुळेच या तालुक्याच्या प्रगतीची वाटचाल यशस्वीपणे सुरु आहे. तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्यातील तिर्थक्षेत्र पर्यटनाला पाटबळ देण्याचे काम सुरु असून, विकास कामांची प्रक्रीया पुढे घेवून जाताना आपल्याकडे असलेली पारंपारिक मंदिरांचा वारसाही जोपासणे हे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले.
प्राचीन मंदिर, धार्मिक संस्कृती आणि रुढी, परंपरा टिकल्या तरच समाजाची जडणघडण ही विचारांच्या आधारावर होवू शकेल. आपल्याला लाभलेला हजारो वर्षांचा हिंदु संस्कृतीचा वारसा खुप मोठा असून, आज आपल्या धार्मिक परंपरा नष्ट करण्याचे प्रयत्न होत आहेत. यासाठी हिंदु धर्मियांची एकजुट महत्वाची असून, प्रयाग येथे महाकुंभ मेळ्याच्या निमित्ताने होणारी गर्दी सुध्दा हिंदु धर्माच्या एकजुटीचे प्रतिक असल्याचे त्यांनी सांगितले.
शिर्डी आणि राहाता परिसरातील अध्यामिक पर्यटनाच्या दृष्टीने शिर्डी येथे थिम पार्कचे काम लवकरच सुरु होणार असून, तालुक्यातील गोदावरी कालव्यांचे नूतणीकरण तसेच शिर्डी औद्योगिक वसाहतीतून युवकांच्या रोजगाराचे काम पुढे घेवून जाण्याचा संकल्प आपला असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, साहेबराव निधाणे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.