spot_img
spot_img

अवकाळीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत द्या -डॉ. जयश्री थोरात कौठे धांदरफळ येथील गाई दगावलेल्या घुले कुटुंबीयांचे डॉ. थोरात यांच्याकडून सांत्वन

संगमनेर( जनता आवाज वृत्तसेवा ) :- संगमनेर तालुक्यात काल अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याचबरोबर कवठे धांदरफळ येथील निवृत्ती रखमा घुले यांच्या दोन गाई वीज पडून मृत पावल्याने या कुटुंबीयांचे मोठे नुकसान झाले असून सर्व नुकसानग्रस्तांचे तातडीने पंचनामे करून त्वरित मदत द्यावी अशी आग्रही मागणी संगमनेर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केली आहे. त्याचबरोबर परिसरामध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी त्यांनी केली.

कौठे धांदरफळ येथील निवृत्ती रखमा घुले यांच्या दोन गाई काल वीज पडून मृत्यू पावल्या यानंतर आज तातडीने डॉ. थोरात यांनी घुले कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी समवेत ज्येष्ठ नेते पांडुरंग घुले, प्राजक्ता घुले आदिसह शासकीय अधिकारी व गावातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. थोरात म्हणाल्या की, प्रत्येक शेतकरी हा अत्यंत मोठ्या कष्टातून आपले पिके उभी करतो. संघर्ष शेतकऱ्यांच्या जीवनात कायम असतो. संगमनेर तालुक्यामध्ये पशुधन मोठ्या प्रमाणात आहे. दुधाचा तालुका ही आपली ओळख निर्माण झाली आहे. प्रत्येक घरापुढे किमान एक दोन गाई असतात. काल झालेल्या अवकाळी पावसाने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून घुले कुटुंबीयांच्या दोन गाई वीज पडून मृत पावलेले आहेत.

या कुटुंबाला तातडीने मदत गरजेची आहे. म्हणून प्रशासनाने कोणताही हलगर्जीपणा न करता कोणताही देखावा न करता त्वरित मदत देण्यासाठी कार्यवाही करावी अशी मागणी त्यांनी केली.

तर पांडुरंग पाटील घुले म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात हे जेव्हा महसूलमंत्री व कृषीमंत्री होते. त्यावेळेस अवकाळी किंवा कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळत होती.

यावेळी सुनंदा घुले, निवृत्ती घुले आदींसह परिवारातील सर्वांशी संवाद साधून डॉ. थोरात यांनी त्यांचे सांत्वन केले याचबरोबर परिसरामध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

दुधामुळे या कुटुंबाला आर्थिक उत्पन्न मिळत होते. मात्र गाई मृत पावल्याने या कुटुंबीयांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने आता फक्त घोषणाबाजी न करता नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत दिली पाहिजे. संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या नेहमी पाठीशी उभे राहिले पाहिजे.

– डॉ. जयश्री थोरात

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका हा आपला एक परिवार आहे. तालुक्यातील प्रत्येक कुटुंबाच्या सुख दुःखात सर्वजण सहभागी होतात. एकमेकाला मदत करतात. ही आपली परंपरा आहे. आज घुले कुटुंबीयांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!