अहिल्यानगर( जनता आवाज वृत्तसेवा ) :- शिर्डी येथे पकडलेल्या भिक्षेकरांना विसापूर कारागृहात हलवण्यात आले होते. त्यातील १३ भिक्षेकऱ्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. मात्र ते पळून जात असल्याने त्यांना बांधून ठेवण्यात आले होते. यातीलच १३ पैकी चार भिक्षेकरांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती जिल्हा रुग्णालयातून मिळाली आहे.
जिल्हा रुग्णालयाने आतापर्यंत फक्त दोन भिक्षेकऱ्यांचाच मृत्यू झाल्याचे अधिकृतपणे सांगितले असले तरी सद्यस्थितीमध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली.
दरम्यान भिक्षेकऱ्यांना विसापूर कारागृहातून नगरच्या जिल्हा रुग्णालयात आणण्यात आल्यानंतर आम्हाला बांधून ठेवले. अन्न पाणी दिले नाही. उपचारही करण्यात आले नाहीत, असे तेथील काही भिक्षेकऱ्यांनी माध्यमांना सांगितले.
श्रीराम नवमी निमित्त शिर्डी पोलिसांनी राबवलेल्या मोहिमेमध्ये भिक्षेकऱ्यांना पकडण्यात आले होते. त्यापैकी काही भिक्षेकऱ्यांना विसापूर येथे रवाना करण्यात आले होते. तेथीलच १३ भिक्षेकऱ्यांना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले होते.
दोन भिक्षेकऱ्यांचा मृत्यू झालेला आहे. याबाबत त्यांच्यावर काय उपचार झाले? कोणाचा हलगर्जीपणा होता? याबाबत चौकशी केली जाईल.
– डॉ. नागोराव चव्हाण, शल्यचिकित्सक- जिल्हा रुग्णालय



