लोणी(जनता आवाज वृत्तसेवा):-शेती क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांनी पुढे जाण्याची गरज आहे. कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून मिळणाऱ्या तंत्रज्ञानाचा उपयोग आपल्या प्रत्यक्ष शेतात करून आपले उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करावेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा फायदा घेऊन शेतकऱ्यांनी पुढे जावे यासाठी कृषी विज्ञान केंद्र आपल्या सोबत असल्याचे प्रतिपादन पायरेन्स संस्थेच्या विश्वस्त तथा मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. सुप्रिया ढोकणे पाटील यांनी केले.
संस्थेचे अध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली आणि कृषी विज्ञान केंद्र बाभळेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने तेलबिया उत्पादन वाढीसाठी आयोजित तेलबिया प्रात्यक्षिक प्रकल्पाच्या शुभारंभ शेतकरी परिसंवादात डाॅ.ढोकणे पाटील बोलत होत्या. यावेळी संस्थेचे पायरेन्सचे सचिव डाॅ. निलेश बनकर, कृषी विज्ञान केंद्राचे संचालक डॉ. उत्तमराव कदम, केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ शैलेश देशमुख, शांताराम सोनवणे, भरत दवंगे, डॉ. विलास घुले डॉ. विठ्ठल विखे, संज्जला लांडगे, डॉ. प्रियंका खर्डे, कैलास लोंढे आदींसह गणेश परिसरातील अस्तगाव, डोऱ्हाळे, कनकुरी, पिंपळस, दहेगाव कोऱ्हाळे येथील शेतकरी उपस्थित होते.
डॉ.सुप्रिया ढोकणे पाटील म्हणाल्या, मंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातून आज राज्यासह अहिल्यानगर मध्ये सर्वांगीण विकास होत आहे. या विकासाच्या माध्यमातून राज्य पुढे जात आहेत. मंञी विखे पाटील यांच्यामुळे आज चाळीस वर्षानंतर निळवंडाचे पाणी हे लाभ क्षेत्रात आले आहे.यामुळे जिरायत भाग बागायत होणार आहे. आता कृषी विज्ञान केंद्राची जबाबदारी अजून वाढली आहे. शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान देऊन त्यांचे शेती उत्पादन वाढवण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राला प्रयत्न करावा. शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान अवगत करत असताना कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्र शास्त्रज्ञांच्या सल्ल्यानुसार शेती व्यवसायाला चालना द्यावी असे सांगून केंद्रामार्फत सुरू असलेल्या विविध सेवा सुविधांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे असेही त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ.उत्तमराव कदम यांनी उपस्थित शेतकऱ्यांना पिकाच्या अवस्थेनुसार त्याच्या गरजेनुसार ठराविक अंतराने ठराविक वेळेत त्याच्या खतांचे व्यवस्थापन, सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब केला तर नक्कीच उत्पादनातील तफावत कमी होईल.
ग्लोबल वॉर्मिंगचे शेतीवर होणारे परिणाम याबाबत उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. भरत दंवगे यांनी शेतकऱ्यांना सोयाबीन पीक उत्पादन तंत्रज्ञान त्यामध्ये बीज प्रक्रिया, लागवड पद्धती लागवडीचे अंतर खतांचे व्यवस्थापन तन नियंत्रण कीड रोगव्य नियंत्रण यावर मार्गदर्शन केले. तर शैलेश देशमुख यांनी सोयाबीन लागवड पद्धत, लागवड अंतर, बीज प्रक्रिया, उत्पादन वाढीसाठी आवश्यक बाबीं आणि सुधारित फुले संगम या वाणाची माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन विस्तार विभागाच्या डॉ. प्रियंका खर्डे यांनी केले.