पारनेर (जनता आवाज वृत्तसेवा):- नगर तालुक्यातील गावांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे खा. नीलेश लंके यांनी राबविलेली स्वच्छता मोहिम व गड किल्ले संवर्धन उपक्रमांतर्गत करण्यात येत असलेल्या गडांच्या स्वच्छतेवर टिका करणाऱ्या भाजपाचे मंडलाध्यक्ष राहुल पाटील शिंदे यांना वाळवणेचे माजी सरपंच सचिन पठारे यांनी चांगलेच खडे बोल सुनावत झाडू हाती घ्यायला तुमची पाटीलकी आडवी येते , त्याला आम्ही काय करणार असा टोला लगावला आहे.
पठारे यांनी सांगितले की, अतिवृष्टीमुळे ज्यावेळी गोरगरीबांच्या घरात पावसाचे पाणी शिरते, जनावरे वाहून जातात त्याचा कळवळा नीलेश लंके यांच्यासारख्या लोकनेत्यालाच येऊ शकतो. तुमच्या सारख्या कडक ड्रायक्लिनचे कपडे घालून केवळ पाहणी दौरा करणारांना, तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या व प्री वेडिंग आणि पोस्ट वेडिंग पुढाऱ्यांना काय येणार ? झाडू हाती घ्यायला तुमची पाटीलकी आडवी येते , त्याच द्वेशातून तुम्ही टीका करत आहात. कोणाची तरी खुशमस्करी करून राजकारण करण्याचे दिवस आला संपले आहेत.व्यासपीठावरून भाषणे ठोकून कोणी पुढारी होत नाही , हे देखील लक्षात ठेवा असेही पठारे यांनी शिंदे यांना सुनावले.
झाड लोट केली म्हणून तुम्ही टीका करता. झाड लोट करणारांना कमी समजू नका. ते साफ-सफाईचेच काम करतात. म्हणून तुमची गावं, शहरं स्वच्छ राहतात. बाकी तुम्ही कचरा करणारच आहात आणि तुमच्यासह तुम्ही केलेला कचरा एक दिवस हाच कचरा साफ करणारा कायमचा साफ करणार आहे. तुम्हाला त्याचा यापूर्वीच अनुभव आलेला असल्याचेही पठारे म्हणाले.
हप्तेखोरीचे बिनबुडाचे आरोप करताना आपण टीका करतो , त्यावेळी आपले योगदान काय हे पाहिजे . तुम्ही किती स्थानिक भुमिपूत्रांना रोजगार उपलब्ध करून दिला ? एमआयडीसीमध्ये आपली किती जमीन गेली ? त्याचा परतावा किती मिळाला ? याची उत्तरे तुम्ही जनतेला द्यावीत , असे आव्हान पठारे यांनी शिंदे यांना दिले.
सुप्यात विविध ठिकाणी तुम्ही बांधकामापूर्वी लोकांकडून आगाऊ पैसे घेउन दहा बारा वर्षे झालीत , तरीही एकाही व्यक्तीला गाळयाचा ताबा का दिला नाही ? तुमचे वर्षानुवर्षे उभे असलेले बांधकामच तुमचे कर्तुत्व सिध्द करतेय , हे देखील लक्षात ठेवा असा टोलाही पठारे यांनी शिंदे यांना लगावला.
आपत्तीग्रस्त भागात खासदारांनी केलेल्या साफ-सफाईवर टीका करण्याआगोदर आपण तिथला एक दगड इकडचा तिकडे केला का ? हे देखील शिंदे यांनी सांगावे. छत्रपतींचे ज्वलंत विचार असणाऱ्या किल्ल्यांचे संवर्धन करत असताना त्यावरही टीका करणे , आपण सोडत नाही , यावरून आपण खरंच शिवप्रेमी आहात का ? हे देखील जनतेला सांगावं , असे आव्हान पठारे यांनी शिंदे यांना दिले.