मुंबई (जनता आवाज वृत्तसेवा):-कॉर्पोरेट व खासगी संस्थांनी सामाजिक उत्तरदायित्वाचे काम करताना शहरी भागावर लक्ष केंद्रीत न करता दुर्गम आणि विकासाच्या दृष्टीने मागास जिल्ह्यांमध्ये गुंतवणूक व सामाजिक उत्तरदायित्व उपक्रम राबविण्यावर भर द्यावा. महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तनाच्या नव्या टप्प्यात सर्वांनी एकत्र येत व्यापक आणि परिणामकारक परिवर्तन घडवून आणूयात, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशनची पाचवी व्यवस्थापकीय संचालक मंडळाची बैठक सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे पार पडली. यावेळी सिद्धिविनायक देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर, मुख्य सचिव राजेश कुमार, ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, व्हीएसटीएफचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीणसिंह परदेशी, टाटा ग्रुपचे अध्यक्ष नोवेल टाटा, जेएसडब्ल्यू ग्रुपच्या संगीता जिंदाल, आयडीबीआयचे व्यवस्थापकीय संचालक राकेश शर्मा, जीआयसी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक रामास्वामी नारायणन यांच्यासह गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य उपस्थित होते.
दर्जा व्यवस्थापनासंदर्भात क्वॉलिटी कौन्सिल ऑफ इंडिया आणि व्हिएसटीएफ यांच्यात तसेच ‘हरित छत्रपती संभाजीनगर उपक्रम’ राबविण्यासंदर्भात एसटीएल, व्हिएसटीएफ व छत्रपती संभाजीनगर महापालिका, सामाजिक वनीकरण विभाग यांच्यात यावेळी सामंजस्य करार करण्यात आला.