कोल्हार (जनता आवाज वृत्तसेवा):-कोल्हार येथील ब्रह्मकुमारीज सेवा केंद्रा मार्फत ब्रह्मकुमारीज संस्थेच्या माजी मुख्य प्रशासिका राजयोगिनी दादी प्रकाशमाणि जीं यांच्या 18 व्या पुण्यतिथी(25 ऑगस्ट 2025 ) व विश्वबंधुत्व दिना निमित्ताने विशाल रक्तदान अभियान कार्यक्रम शनिवार दि.23 ऑगस्ट, 2025 रोजी स.10 ते 1 या वेळेत “ओम शांती भवन”
कोल्हार येथे राबविण्यात आला. याप्रसंगी कोल्हार बुद्रुकचे माजी सरपंच ॲड सुरेंद्र खर्डे पाटील बोलत होते, ते पुढे म्हणाले की रोज सकाळी मनाला बेचैन करणाऱ्या बातम्या वर्तमानपत्रातुन टीव्ही तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून ऐकू येतात कुठे सुनामी तर कुठे भूकंप तर कुठे अपघात तर कुठे युद्धजन्य परिस्थिती या सर्वांपासून स्वतःला शांत ठेवायचे असेल तर मेडिटेशन शिवाय पर्याय नाही आणि तो पर्याय आपल्या गावात असलेल्या ओम शांती सेंटरच्या माध्यमातून आपल्याला मिळत आहे. यावेळी त्यांनी सर्व धर्म समभाव अशी शिकवण ठेवून कार्य करत असल्याबद्दल शिवाजी भाई (आप्पा) यांचे विशेष कौतुक केले. विद्या दाना बरोबरच रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याचे त्यांनी यावेळी सांगुन या उपक्रमास शुभेच्छा देऊन धन्यवाद व्यक्त केले.
दरम्यान सर्वप्रथम आलेल्या सर्व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी विद्यालयातर्फे प्रमुख अतिथींना तिलक लावून पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
कोल्हार येथील युवा उद्योजक शेखर बोऱ्हाडे हे देखील या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी कोल्हार येथील ओम शांती सेंटर मार्फत वेळोवेळी होणाऱ्या उपक्रमाचे विशेष कौतुक करून रक्तदान हे जीवनदान असल्याचे नमूद केले व या कार्यास शुभेच्छा दिल्या.
व्यापारी पतसंस्थेचे अध्यक्ष संजय शिंगवी यांनी देखील या उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या व विद्यालयाचे आभार व्यक्त केले.
यावेळी प्रवरा मेडिकल मार्फत रक्तदान शिबिरासाठी आलेल्या टीमचे प्रमुख डॉ. वरपे यांनी देखील एकदा रक्तदान केल्याने तीन जीवांचे प्राण वाचतात असे सांगुन 18 वर्षांपुढील व 60 वर्षाच्या आतील कोणताही व्यक्ती रक्तदान करू शकतो. यावेळी जमलेल्या सर्वांना त्यांनी उत्तम आरोग्यासाठी रक्तदान करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनगाव सेंटरच्या संचालिका पद्मा बहेनजी यांनी केले. संस्थेतर्फे भारतासह नेपाळ मध्ये एकाच वेळी हे रक्तदान महाअभियान राबवून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदविण्यात येणार आहे.
त्यानंतर देशभरातील सहा हजारांहून अधिक सेवा केंद्रांवर एकाच वेळी दि. २२, २३, २४ आणि २५ ऑगस्ट रोजी विशाल रक्तदान शिबिरे आयोजित केली आहेत या अभियानांतर्गत एक लाख युनिट रक्तदानाचा संकल्प करण्यात आल्याचे कोल्हार सेंटरच्या संचालिका स्वाती दीदी यांनी सांगितले.
याप्रसंगी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुधीर खर्डे, संपतराव खर्डे, पुरुषोत्तम हिरानंदानी, विजय डेंगळे, महेश फलटणे, श्रीकांत बेंद्रे,अजय कासार, विष्णू भाई, प्रकाश भाई, कार्तिक चव्हाण, श्याम कोळपकर, बापू कोळपकर, आबासाहेब देवकर, कडसकर तात्या, हरि कडसकर आदी मान्यवर उपस्थित होते.