लोणी (जनता आवाज वृत्तसेवा):- महाराष्ट्र राज्याला दुष्काळमुक्त करण्याचा केलेला संकल्प पुर्णत्वास जावा अशी प्रार्थना करीत जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यातील जनतेला गणेश उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राज्य सरकारने यंदाच्या वर्षी गणेश उत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्याने लोकसहभागातून या उत्सवाचा आनंद अधिकच व्दिगुणीत होईल असा विश्वासही त्यांनी व्यकत केला.
प्रवरा उद्योग समुहाच्या गणेश उत्सवाचा प्रारंभ मंत्री विखे पाटील यांच्या शुभहस्ते श्री.गणेशाची प्रतिष्ठापणा करुन करण्यात आला. पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर ना.विखे पाटील यांनी सपत्नीक पुजा केली. कारखान्याचे चेअरमन डॉ.सुजय विखे पाटील यांच्यासह प्रवरा उद्योग समुहातील सर्व संसथाचे पदाधिकारी, संचालक आणि कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.
देशात आणि देशा बाहेरही हा मंगलमय उत्सव सुरु झाला आहे. समाज जागृती आणि राष्ट्र जागृतीसाठी प्रेरणादायी असलेला हा उत्सव यंदाच्या वर्षी महायुती सरकारने राज्य महोत्सव म्हणून घोषीत केला. राज्याच्या सांस्कृतीक प्रथा, परंपरा यामुळे अधिकच प्रभावशाली होतील. लोकांचा सहभाग यामुळे अधिक वाढेल हा विचार या निर्णयामागे असल्याचे त्यांनी सांगितले.
यंदाच्या वर्षी पावसाचे आगमन वेळेत आणि चांगल्या पध्दतीने झाल्यामुळे राज्यातील सर्व धरणं भरली आहेत. याचे समाधान या उत्सवामध्ये निश्चित दिसून येत आहे. त्यामुळे एकुणच समाजामध्ये चैतन्याचे वातावरण या उत्सवाच्या निमित्ताने आहे. मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्प केला आहे. तो पुर्णत्वास जाण्यासाठी श्री.गणेशाचे झालेले आगमन हा शुभशकून आहे. हा संकल्प पुर्ण करण्यासाठी आम्हाला शक्ती द्यावी अशी प्रार्थना या निमित्ताने गणेशाच्या चरणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.
लोणी बुद्रूक येथेही परंपरे प्रमाणे एक गाव एक गणपती या संकल्पनेतून गणेश उत्सवास प्रांरभ करण्यात आला. गेली अनेक वर्षे मंत्री विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉ.सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लोणी बुद्रूक ग्रामस्थांच्या वतीने एकाच गणपतीची प्रतिष्ठापणा करण्यात येते. माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी सपत्नीक श्री.गणेशाची पुजा केली. याप्रसंगी नागरीक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणेश उत्सवाच्या निमित्ताने ऑपरेशन सिंदुर आणि स्वदेशी वापराच्या संदर्भात सामाजिक संदेश देण्याच्या केलेल्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून आत्मनिर्भर भारताचे प्रतिबिंब या राज्य महोत्सवातून उमटविण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले आहे.