राहाता दि.२९( जनता आवाज वृत्तसेवा ):-बदली झालेल्या ठिकाणी हजर न होणा-या महसूल विभागातील आधिका-यांवर आता कारवाई करुन, त्यांची सेवा खंडीत करण्याचा इशारा महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे.
बदलीच्या ठिकाणी हजर न होणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबनाच्या नोटिसा – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पा.
माध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, महसूल विभागातील बदल्यांची प्रक्रिया केव्हाच संपली आहे. त्यामुळे बदली झालेल्या ठिकाणी अनेक आधिकारी अद्याप हजर होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. याची गंभीर दखल आता विभागाने घेतली असल्याचे स्पष्ट करुन, त्यांनी सांगितले की, विदर्भ, मराठवाड्यातील ७० टक्के जागा यापुर्वी रिक्त होत्या, त्या सर्व जागांवर आता आधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. परंतू काही ठिकाणी आधिकारी हजर होत नसल्याने अशा आधिका-यांना आता निलंबनाच्या नोटीसा देण्यात आल्या असून, त्यांच्या विभागीय चौकशा आणि सेवा खंडीत करण्याचा निर्णयही वेळप्रसंगी विभागाला घ्यावा लागेल असा इशारा त्यांनी दिला.
राहुरी तालुक्यातील उंबरे येथील घटना अतिशय गंभीर असून, याची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधिक्षकांना दिले आहेत. याबाबतीतील संपूर्ण माहीती पुढे आणण्यासाठी पोलिस प्रशासन प्रयत्न करीत आहेत. या घटनेतील दोषीवर कठोर कारवाई केली जाईल, यापुर्वी श्रीरामपूर तालुक्यात अशाच घटना घडल्या होत्या, त्यावेळी मोक्का कायद्यांन्वये कारवाई करण्यात आली होती. उंबरे येथील घटना पाहाता ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत अशा घटना घडतील तेथील पोलिस आधिका-यांवर कारवाई करण्याच्या सुचना यापुर्वीच दिल्या आहेत. परंतू समाजातील जबाबदार घटकांनीही पुढे येवून अशा प्रवृत्तींबद्दल पुढे येवून माहीती देण्याचे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले आहेत.



