राहाता दि.२२ ( जनता आवाज वृत्तसेवा ):-निळवंडेचे पाणी जिरायती भागाला मिळवून दिल्याचा समाधान खूप आले. या धरणाच्या लोकार्पणासाठी प्रधानमंत्री येण्याचे मान्य केल्याने शेतकऱ्यांच्या आनंदात सहभागी होण्यासाठीच पंतप्रधानांचा दौरा असल्य्चे प्रतिपादन राज्याचे महसुलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
तालुक्यातील केलवड येथे ना. विखे पाटील निळवंडेच्या चारीला आलेल्या पाण्यात शेतकऱ्यांसमवेत नारळ अर्पण करून पूजन केले. यावेळी केलवडच्या शेतकर्यांशी संवाद साधला. याप्रसंगी अॅड. अनिल गमे, माजी सरपंच बाळासाहेब सुधाकर गमे, प्रशांत गमे, श्रीनिवास घोरपडे, जगन्नाथ काटकर, साळबा राऊत, शिवराम राऊत, माधव काटकर, किरण राऊत, सचिन घोरपडे, बाळुगिर गोसावी, पर्बत राउत, नाथु राऊत, तसेच राऊत वस्ती भागातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निळवंडेच्या पाण्याची दुष्काळाचे चटके सोसणार्या शेतकर्यांना बर्याच वर्षाची पाण्याची प्रतिक्षा होती. निळवंडेचे पाणी आले तर या भागातील समृध्दता अधिक वाढेल.त्यामुळेच पाणी आल्याने शेतकरी आनंदीत झाला याचे समाधान मला आहे. शेतकर्याच्या चेहेर्यावरील आनंद या पाण्याचा दिलासा मिळाल्याने दुष्काळावर मात करणे सहज सोपे होईल. केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्याने निळवंडे प्रकल्प मार्गी लागला. निळंवंडे ची पहिली चाचणी यशस्वी झाली आता दुसरी चाचणी यशस्वी होत आहे. दुसर्या चाचणीच्या निमित्ताने दुष्काळी परिस्थिती मध्ये पाणी देता आले हे समाधान माझ्या मनात आहे. केलवड ला पाणी पोहचल्याचे समाधान असल्याचे ना. विखे पाटील यांनी सांगितले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निळवंडे चे लोकार्पण करण्यासाठी येत आहे. खर्या अर्थाने हा शेतकर्यांच्या हिताचा दौरा आहे. लवकरच उजव्या कालव्याचे काम पुर्णत्वास जाणार असून अकोले तालुक्यातील शेतकर्यांच्या मागणी प्रमाणे उजव्या उच्चस्तरिय कालव्यांना सुध्दा आपण पाणी देण्याचा शब्द दिला आहे. हे अश्वासन राज्यसरकार पुर्ण करेल, असे ना. विखे पाटील यांनी सांगितले.



