संगमनेर दि.३( जनता आवाज वृत्तसेवा ):-आघाडी सरकारमध्ये मंत्री असताना समन्यायी पाणी वाटप कायद्याच्या विरोधात शब्दही बोलला नाहीत,आता निळवंडे धरणातील पाण्याकडे बोट दाखवून आ.शंकरराव गडाख यांनी दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करू नये असा इशारा निळवंडे भोजापूर पाट पाणी कृती समितीचे नेते शरद गोर्डे यांनी दिला आहे.
यासंदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात गोर्डे यांनी म्हणले आहे की,समन्यायी पाणी वाटप कायद्याचे भूत जिल्ह्याच्या मानगुटीवर विधानसभेत प्रस्ताव मांडून कोणी कसे बसवले हे तूम्हाला चांगले माहीत आहे.पण त्यावर तुम्ही बोलायला तयार नाही.पण थेट निळवंडे धरणाच्या पाण्याकडे बोट दाखवून जिरायती भागातील शेतकऱ्यांच्या भावना दुखवायचे काम करता हे अतिशय दुर्दैवी आहे.
एकीकडे जिल्ह्यात यंदा पावसा अभावी दुष्काळी परीस्थिती आहे.पुरेसा पाऊस नसल्याने शेती व्यवसाय धोक्यात आले आहेत.त्यामुळे यंदा जिल्ह्यातील धरण समूहातून पाणी सोडू नका या शेतकऱ्यांच्या मागणीला पाठबळ देण्याऐवजी आ.गडाख यांनी थेट निळवंडे धरणातून पाणी सोडण्याची केलेली मागणी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे असल्यासारखे असल्याचे गोर्डे पाटील म्हणाले.
वास्तविक समन्यायी पाणी वाटप कायदा रद्द करण्यासाठी आ.गडाख यांनी आघाडी सरकारमध्ये मंत्री असताना पुढाकार घ्यायला हवा होता.मुख्यमंत्री त्यांच्या पक्षाचे होते.परंतू त्यावर कधीही भाष्य न केलेल्या गडाखांनी निळवंडे धरणातून पाणी सोडण्याची केलेली मागणी म्हणजे आ.गडाख यांची दुटप्पी भूमिका दाखवून देणारी आहे.एकीकडे गोदावरी प्रवरा धरण समूहातील कोणत्याच धरणातून पाणी सोडू नये ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मागणी असताना आ.गडाख यांनी निळवंडे धरणातून पाणी सोडण्याची केलेली मागणी आश्चर्यकारक असल्याचे त्यांनी सांगितले.
निळवंडे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना कालव्याद्वारे आताच कुठेतरी पाणी मिळाले आहे.दुष्काळी भागाला कुठेतरी दिलासा देण्याचे काम होत असताना आ.गडाख यांची निळवंडे धरणातून पाणी सोडण्याची मागणी आम्ही कधीही पूर्ण होवू देणार नसल्याचा इशारा गोर्डे यांनी दिला आहे.



