राहाता, दि.२२ ( जनता आवाज वृत्तसेवा):-सततच्या पावसाने नुकसान झालेल्या पुणतांबा मंडळातील सुमारे 11 गावांतील ६ हजार २८० शेतकऱ्यांना ९ कोटी १० लाख रुपयांची शेती पीकांची भरपाई देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्यसरकारने घेतला असल्याची माहिती महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
पुणतांबा मंडळातील सुमारे ११गावांतील ६ हजार २८० शेतकऱ्यांना ९ कोटी १० लाख रुपयांची शेती पीकांची भरपाई देण्याचा महत्वपूर्ण निर्णय – पालकमंत्री विखे पाटील
या संदर्भात माहिती देताना विखे पाटील म्हणाले की, जुन २०२२ ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झाला. तालुक्यातील पुणतांबा महसुल मंडळातील पुणतांबा रस्तापूर, वाकडी, धनगरवाडी, न.पा.वाडी, रामपूरवाडी, जळगाव, एलमवाडी, शिंगवे, चितळी, संभाजीनगर या ११ गावांमधील सुमारे ६ हजार ४७५ शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसान झालेले होते. या नुकसानीचे पंचनामे करुन मदतीचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते.
मदतीच्या आलेल्या प्रस्तावाचा विचार करुन राज्य सरकारने अतिवृष्टीचा निकषाबाहेरील पावसामुळे शेती पिकांच्या नुकसानीकरीता विशेष बाब म्हणून पुणतांबा महसूल मंडळातील ११ गावांकरीता मदत जाहीर केली आहे. या मदतीचा लाभ शेतकऱ्यांना लवकरच मिळणार असून सदर मदतीचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात टप्प्या-टप्प्याने जमा होणार असल्याचे विखे पाटील यांनी स्पष्ट केले.