अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक निवडणुकी निमित्त आज निशा लॉनस येथे भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
शेतकऱ्यांच्या शेतीमाल वाहतुकीसाठी किसन रेल सुरू करणार – खा.डॉ.सुजय विखे पाटील
अहमदनगर (प्रतिनिधी):शेतकऱ्यांच्या शेतीमाल बाजारपेठेत नेण्यासाठी अहमदनगर येथून किसन रेल सुरू करणार असल्याचे आश्वासन खा.डॉ.सुजय विखे पाटील यांनी देवून या करिता रेल्वेमंत्री यांची भेट घेऊन त्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सांगितले.
यावेळी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री बबनराव पाचपुते हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डीसीसी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, अक्षय कर्डिले हे उपस्थितीत होते.
यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की आपल्या कडील शेतकऱ्याचा शेतीमालाची वाहतूक ही गाडीने होते त्याकरिता खर्च हा जास्त लागतं असून हा खर्च कमी केला तर शेतकऱ्याला फायदा होईल, त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या किसन रेल्वेने आपल्या भागातील शेतकऱ्यांचा शेतीमाल हा पाठविण्यासाठी किसन रेल्वे ही अहमदनगर येथे सुरू करण्याची मागणी केली असून लवकरच ही किसन रेल्वे आपल्याकडे सुरू होईल असे त्यांनी सांगितले. उत्पादन खर्च कमी करून शेतकऱ्यास अधिकचा नफा कसा करून देता येईल याकरिता आमचा प्रयत्न राहणार असल्याचे सांगताना खा.विखे यांनी शेतकऱ्यांना पायाभूत सुविधा ह्या उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, याचाच एक भाग म्हणून बाजार समितीसाठी स्वतंत्र रस्ता मंजूर करून या करिता अडीच कोटी निधी हा उपलब्ध करून देण्यात आला आहे. या रस्त्याचे काम सुरू देखील झाले आहे. कांद्याचे अनुदान काही अटी – शर्ती मुळे मिळण्यास अडचण येत असल्याच्या तक्रारी होत्या त्यावर या आठवड्यात शासन योग्य निर्णय घेणार असून याची लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घोषणा करणार असल्याचे यावेळी सांगितले.
विरोधकांचा समाचार घेताना सुजय विखे म्हणाले की विरोधकांकडे कुठलेही विकास कामा बाबत दिशा नाही की त्यांच्याकडे वैचारिक पात्रता , केवळ विरोध करायचा म्हणून ते धादांत खोटे आरोप करत आहेत. अशा आरोपांना आपण भीक घालत नाहीत, आपले नाणे खणखणीत आहे त्यामुळे आपण कोणाचाही विचार करत नाहीत. विखे पाटील घराण्यांनी आजवर गोरगरीब जनतेसाठी काम केले आहे आणि तोच वारसा आपणही पुढे चालवत असून आमच्या वर कुठलाही डाग नाही हाच पोटशूळ विरोधकांना सतावत असतो म्हणुच ते आमच्यावर टीका करतात. आपली या जनतेशी बांधिलकी असून कायम यांच्या उध्दारा करिता काम करू अशी ग्वाही याप्रसंगी त्यांनी उपस्थित मतदारांना दिली.
याप्रसंगी माजी मंत्री बबनराव पाचपुते, शिवाजीराव कर्डिले यांनी उपस्थित कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन केले तर दादाराव चितळकर,अरुण होळकर, दिलीप भालसिंग या माजी संचालकांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या मेळाव्यासाठी भाजप तालुका अध्यक्ष मनोज कोकाटे, अशोकराव झेरेकर, केशवराव अडसूरे, यांच्या सह सर्व ग्रामपंचायत सदस्य, सेवा सोसायटीचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.