मुंबई( जनता आवाज वृत्तसेवा ) :- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये जागावाटपाची तयारी अंतिम टप्प्यात आली असल्याचे दिसत आहे. महाविकास आघाडीमध्ये देखील काही जागांवरून तिढा असून तो देखील आता निवळला असल्याचे दिसत आहे.
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याचे बोलले जात आहे.
महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस 100 ते 105 जागांवर, शिवसेना 96 ते 100 जागांवर, तर शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 80 ते 85 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे समजते. तसेच मुंबईमधील बहुतांश भागांवर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार असणार असल्याची माहिती समोर येत आहे. महाविकास आघाडीचा हा फॉर्म्युला लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या विजयावर आधारित असल्याचे सांगण्यात येत आहे.
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या मध्यस्थीनंतर शिवसेना ठाकरे गट व काँग्रेस पक्षातील वाद मिटला असल्याचे दिसत आहे. मुंबईमध्ये शिवसेनेलाच जास्त जागा देण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.
शिवसेना ठाकरे गटाला 18 जागा, काँग्रेसला 14 जागा तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाला केवळ 2 जागा मिळणार असल्याचे समजते. दरम्यान, महाविकास आघाडीमधील जागावाटपावर आजच्या बैठकीनंतर शंभर टक्के तोडगा निघणार असल्याचे बोलले जात आहे.




Total Users : 604881