शिर्डी( जनता आवाज वृत्तसेवा ):-नाबार्डच्या अर्थ सहाय्याने राबविण्यात येत असलेल्या जलसिंचन प्रकल्पांची कामे निर्धारित वेळेत होण्यासाठी प्रकल्पनिहाय करण्यात येत असलेल्या कामाचा कृती आराखडा तयार करून त्या प्रमाणे कामे सुरू करावीत, अशा सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिल्या.
जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक झाली. बैठकीस मुख्यमंत्री यांचे मुख्य आर्थिक सल्लागार तथा ‘मित्रा’ चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, जलसंपदा विभागाचे सचिव संजय बेलसरे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता तथा सह सचिव संजीव टाटू , यांच्यासह जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तर गोदावरी खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार व नाबार्डचे अधिकारी (दूरदृश्यप्रणाली द्वारे) उपस्थित होते.
जलसंपदा मंत्री यांनी नाबार्ड अर्थ सहाय्याद्वारे अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करणे व पूर्ण प्रकल्पांच्या वितरण प्रणालीमध्ये सुधारणा करण्याबाबतची कामे दोन टप्यात करण्या ऐवजी ती एकाच टप्प्यात करण्याच्या अनुषंगाने वित्त विभागाने दिलेल्या सूचना व सर्व नियमावलींचे पालन करून कामे दोन टप्प्यान ऐवजी एकाच टप्प्यात करण्यासाठी मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करावा.
मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले, गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळाने नाबार्ड अर्थसाहित कामांचा मास्टर प्लॅन तयार करावा. यासाठी प्रकल्प निहाय व काम निहाय अहवाल सादर करावा. यासाठी कन्सल्टंटकडून तातडीने अहवाल प्राप्त करून घ्यावा. तसेच जी कामे सुरू आहेत, प्रगतीपथावर त्याची माहिती नाबार्डला देण्यात यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.