कोपरगाव( जनता आवाज वृत्तसेवा ): – भारत मातेच्या वीर सैनिकांच्या शौर्याला वंदन करण्यासाठी व त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने कोपरगाव शहरात भव्य तिरंगा मशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले. समस्त देशभक्त कोपरगांवकरांच्या वतीने घेण्यात आलेल्या या उपक्रमात युवा प्रतिष्ठानचे संस्थापक युवानेते मा. विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी युवा सेवकांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि आकर्षक चित्ररथ तयार केले होते.
या रॅलीचे प्रमुख आकर्षण ठरले ते ब्रह्मोस क्षेपणास्त्र आणि एस-400 संरक्षण प्रणाली यांचे प्रतिकात्मक चित्ररथ. देशाच्या संरक्षण व्यवस्थेचे सामर्थ्य दाखवणारे हे चित्ररथ संजीवनीच्या युवा सेवकांनी अत्यंत कल्पकतेने साकारले होते. यामधून देशातील युवाशक्तीची राष्ट्रनिष्ठा आणि सैन्याबद्दलचा अभिमान प्रत्ययास आला.
या रॅलीदरम्यान पेहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या नागरिकांना तसेच देशाच्या सुरक्षेसाठी प्राण अर्पण करणाऱ्या वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. रॅलीच्या माध्यमातून देशभक्तीची ज्योत नव्या पिढीत प्रज्वलित करण्यात आली.
विविध क्षेत्रातील मान्यवर,मा.सैनिक, सर्वधर्मीय, सर्वपक्षीय,सर्व स्तरातील नागरिक बंधू भगिनी,विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होते.या प्रसंगी मा. आ. स्नेहलताताई कोल्हे यांनी या चित्ररथाला साकारणाऱ्या युवकांना कल्पकता दाखवून केलेला या प्रयत्नाने सर्वांना प्रेरणा मिळाली आहे असे मत व्यक्त केले.आयोजन करण्यामध्ये सहभागी असणाऱ्या सर्वांना धन्यवाद व्यक्त केले.
कोपरगावातील नागरिकांनी या रॅलीला मन:पूर्वक प्रतिसाद दिला. रॅली दरम्यान “भारत माता की जय”, “जय हिंद”, “वंदे मातरम्” अशा घोषणांनी शहराचा प्रत्येक कोपरा राष्ट्रप्रेमाने भारावून गेला. सामूहिक राष्ट्रगीताने ही रॅली सांगता झाली त्यामुळे ही रॅली फक्त एक कार्यक्रम न राहता देशप्रेम, एकजूट आणि कृतज्ञतेचे प्रतीक ठरली अशी भावना सर्वांनी व्यक्त केली आहे.