संगमनेर (जनता आवाज वृत्तसेवा) :- ज्यांची चाळीस वर्षे सत्ता असूनही ४० कामे जमली नाही आणि आता गावातील विकासकामे राज्याचे जलसंपदामंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून सुरू आहेत. हा चालू असलेला विकासकामांचा वाढता आलेख काहींना झेपत नसल्याने नाहक भ्रष्टाचाराचे आरोप करत आहे. या सर्व आरोपांची लवकरात लवकर चौकशी करावी. जर आरोप सिद्ध झाले नाही, तर आरोप करणार्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर्वे ग्रामपंचायत सत्ताधारी विखे गटाने पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जोर्वे येथील सत्ताधारी विखे गटाच्या कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की जोर्वे गावामध्ये ग्रामपंचायत कार्यालय, ट्रॅक्टर, ट्रॉली, टँकर, ब्लोअर, रुग्णवाहिका, दवाखाना, अमररथ, पथ दिवे, सौरदिवे, गटारी, विजेचे रोहित्र, पाणीपुरवठा, सभामंडप, रस्ते, वैयक्तिक लाभाच्या योजना अशी विविध प्रकारची विकासकामे पूर्ण झाली आहे.
तर काही विकास कामे चालू आहे. गावातील मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे काम सुरू होणार आहे. या गावात सुरू असणारी विकास कामे विरोधी थोरात गटातील नेत्यांना पाहवत नसल्या मुळे ते सत्ताधारी विखे गटावर भ्रष्टाचाराचा आरोप करुन समाज माध्य मांवर बदनाम करण्याचे काम करत आहे. मात्र, महिला सरपंच आहे म्हणून काहीही आरोप तुम्ही करत असाल तर आम्ही कदापिही सहन करणार नाही.
इतकी वर्षे जनतेला कायम वेठीस ठेवलं जात आहे. ते आता बंद करा. गावातील महिलांना मोफत शिलाई मशिनचे प्रशिक्षण देऊन मशिन वाटल्या, मोफत बेकरी प्रशिक्षण दिलं. तसेच चांगल्या चाललेल्या प्रत्येक कामात अडथळा आणणे, ग्रामसेवकांना अरेरावीची भाषा करणे हे शोभत नाही, असेही निवेदनात म्हटले आहे.
पंचायत समिती प्रशासनाला सत्ताधारी जोर्वेच्या सरपंच प्रिती दिघे, शिवाजीराव कोल्हे, बाबासाहेब काकड, सचिन दिघे, संपतराव राक्षे, हरीष जोर्वेकर, प्रकाश काकड, विशाल थोरात, शिवाजी काकड, नंदू थोरात, रमेश इंगळे, प्रशांत इंगळे, सचिन मोकळ, अभिषेक चव्हाण, बाबासाहेब थोरात, जगदीश इंगळे, भाऊसाहेब वाकचौरे, रविंद्र गाडेकर, बंडू इंगळे, मिरा बाई थोरात, लताताई काकड, मिना इंगळे, वनिता चव्हाण, अलका चव्हाण, अनिता लोणारी, दुर्गा लोणारी, निशिगंधा इंगळे, सुनीता बर्डे, अनिता मोरे, रंजना जाधव, सरला जोर्वेकर आदींनी गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर यांच्याकडे केली आहे
इतिहासात कधी झाली नाही एवढी विकासकामे व योजना गरिबांपर्यंत ना. राधाकृष्ण विखे पाटिल यांच्या माध्यमातून पोहोचविल्या आहे. आमची वाढलेली लोकप्रियता बघून आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत जोर्वे गटात उभे राहण्यासाठी धडकी भरलेले आणि कोणतेही विकास कामे न करता फक्त सामान्य जनतेला वेठीस धरत राजकारण करण्यासाठी हे उद्योग सुरु केले आहे. मागच्या चाळीस वर्षांत काहीच न केल्या मुळे जनतेने विधानसभा निवडणुकीत त्यांना धडा शिकवला आहे. आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कमीत कमी स्वगृही तरी इज्जत राहावी म्हणून त्यांचा चाललेला हा शेवटचा केविलवाणा प्रयत्न आहे. परंतु ‘यह पब्लिक है, सब जानती है!
– गोकुळ दिघे, माजी सरपंच