संगमनेर(जनता आवाज वृत्तसेवा):-“सर्वसामान्य जनतेने माझ्यावर दाखवलेला विश्वास आणि मिळालेली साथ हीच माझी सर्वात मोठी ताकद आहे. त्या ताकदीच्या जोरावर पठार भागासह संपूर्ण तालुक्यातील प्रत्येक गावाचा पाण्याचा प्रश्न सोडवण्या साठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मी कटिबद्ध आहोत. लाडक्या बहिणींच्या डोक्यावरचा पाण्याचा हंडा खाली उतरवण्यासाठी टँकरमुक्त संगमनेर तालुका करणार, असल्याचा विश्वास” आमदार अमोल खताळ यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव देपा येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता श्रावण महाराज जगताप यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. यावेळी भाविकांना मार्गदर्शन करताना आमदार खताळ बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, “तालुक्यातील मायबाप जनतेने परमेश्वराच्या कृपेने माझी लोक प्रतिनिधी म्हणून निवड केली आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जलसंपदा विभाग असल्यामुळे या भागातील पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचाही प्रश्न सोडवण्याचे पुण्याचे काम माझ्या हातून होईल, याची मला खात्री आहे. त्यामुळे जोपर्यंत पाण्याचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत मी शांत बसणार आपणास त्याचा विश्वास आमदारा अमोल खताळ यांनी दिला
“ माझ्या कुटुंबाला वारकरी संप्रदायाचा वारसा लाभला आहे. माझी आई पंढरपूर, देहू, आळंदी आणि त्र्यंबकेश्वर येथे पायी दिंडी सोहळ्यात सहभागी होत असते. त्यामुळे आमच्या परिवारावर वारकरी संप्रदायाचे संस्कार झाले आहेत. मी आज जे काही बोलत आहे ते या संस्कारांमुळेच बोलत आहे. आई-वडिलांचे पुण्य माझ्या कामाला आले असून माझा पिंड राजकारणापेक्षा अध्यात्म आणि वारकरी संप्रदायाकडे अधिक आहे.”जीवनामध्ये कुटुंब, मित्रपरिवार आणि समाजासाठी प्रत्येकाने चांगले कर्म केले पाहिजे. कोणाच्याही वाचून कोणाचे काही थांबत नाही; मात्र आपल्या हातून कुटुंबाची आणि समाजाची चांगली सेवा झाली पाहिजे,” असेही त्यांनी सांगितले.
पिंपळगाव देपा हे गाव अकोले विधानसभा मतदारसंघात येत असले तरी मतदारसंघाचा भेद न करता आपण संपूर्ण तालुका म्हणून काम करत आहोत. तालुक्यातील जनतेने माझ्यावर भरभरून प्रेम केले आहे. ग्रामस्थांकडून विकासकामांबाबत जे प्रश्न व मागण्या येतील, त्या पूर्ण करण्यासाठी माझा शंभर टक्के प्रयत्न राहील.
— अमोल खताळ (आमदार)



