शिर्डी दि.१५( जनता आवाज वृत्तसेवा ):-आयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या मंदीराचे निर्माण आणि काशी विश्वेश्वर मंदीर परीसराच्या विकासातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपराचा नावलौकीक उंचावण्याचे महत्वपूर्ण काम केले असल्याचे गौरवोद्गार महसूल,पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काढले.
आयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या मंदीराचे निर्माण आणि काशी विश्वेश्वर मंदिर परिसराच्या विकासातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा नावलौकीक उंचावण्याचे महत्वपूर्ण काम केले- मंत्री विखे पाटील
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला नऊ वर्षे पुर्ण झाल्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाजनसंपर्क अभियान सुरु करण्यात आले आहे. मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत शिर्डी शहरात या अभियानाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी नागरीकांशी संवाद साधला. केंद्र व राज्य सरकारच्या योजनांच्या माहितीचे पत्रक त्यांनी नागरीकांना वितरीत केले. याप्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, शिवाजीराव गोंदकर शहर अध्यक्ष सचिन शिंदे माजी नगराध्यक्षा सौ.अनिता जगताप विलासराव कोते प्रमोद गोंदकर मधुकर कोते यांच्यासह शासकीय आधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ वर्षाच्या यशस्वी कारकीर्दीत घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयात या देशातील धार्मिक क्षेत्रांच्या विकासाला प्राधान्य दिले.आयोध्येत प्रभू श्रीरामांचे मंदीर व्हावे भारतीयांची इच्छा पूर्ण केली.आज मंदीराचे होत असलेले निर्माण कार्य देशाच्या संस्कृतीचे परंपरेचे प्रतिक ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.काशी विश्वावेर आणि महाकालेश्वर मंदीर परीसराचा विकास देशाच्या अध्यात्मिक परंपरेची नवी ओळख जगासमोर ठरली आहे. केंद्र सरकारच्या धोरणाप्रमाणेच राज्यातील पंढरपूर त्र्यंबकेश्वर शिर्डी आशा महत्वपूर्ण तिर्थक्षेत्रांच्या विकासला राज्य सरकार प्राधान्य देणार असून या भागातील तिर्थक्षेत्र पर्यटन विकसित करण्याचे सरकारचे धोरण असल्याचे त्यांनी सांगितले.
कालच चांद्रयान-३ चे यशस्वी उड्डाण ही सर्व भारतीयांसाठी मोठी घटना ठरली. जगातील मोठया देशांबरोबरच आता भारताने सुध्दा केलेल्या यशस्वी प्रयत्नांमुळे देश आता बलशाली होत आहे. इस्त्रोच्या शास्त्रज्ञांच्या टिमने केलेल्या ऐतिहासिक कामगिरीचे कौतुक करून मंत्री विखे पाटील म्हणाले की,आज सर्वच क्षेत्रामध्ये भारत देश प्रगती करीत आहे.
जगातील इतर देशांची अर्थिक परिस्थिती बिकट झाली असताना भारत देशाची अर्थ व्यवस्था आज वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
सर्वाधिक रोजगार निर्मिती सध्या देशात असून विविध स्टार्ट अपला दिलेले प्राधान्य आणि कौशल्य शिक्षणातून तरूणांना मिळालेल्या नऊ वर्षातील संधी देशाचे विकासाचे नवे पर्व ठरले असल्याचे स्पष्ट करून आज राज्य सरकार त्याच विचाराने काम करीत आहे.शिवसेना भाजप समवेत आता राष्ट्रवादी काँग्रेस सरकार मध्ये सहभागी झाल्याने अधिक गतिमान निर्णय होण्यास मदत होईल.राज्यातील बारा कोटी नागरिकांना आता महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून पाच लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय महत्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.याप्रसंगी जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रांताधिकारी माणिक आहेर यांनी तालुक्यातील शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा सांगितला.



