श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):- भारतीय अवकाश संशोधन संस्थेतील क्षेपणास्त्र विकासात माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांचे महत्त्वाचे योगदान असल्याचे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक, मा उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी केले आहे.
श्रीरामपूर शहर काँग्रेसच्या वतीने आयोजित थोर शास्त्रज्ञ डॉ. अब्दुल कलाम यांच्या जयंती प्रसंगी ससाणे बोलत होते. ससाणे पुढे म्हणाले की क्षेपणास्त्र विकास कार्यामधील अग्नि क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉ. अब्दुल कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. त्यामुळे त्यांना मिसाईल मॅन म्हणून ओळखत. विज्ञानाचा परमभोक्ता व देशात लोकप्रिय असणारे डॉ. अब्दुल कलाम मनाने अतिशय संवेदनशील व साधे होते. भारत सरकारने भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला. अथक परिश्रम, विद्येची अखंड साधना करीत खडतर जीवन जगलेले आणि जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतीपदी निवड झालेले डॉ. अब्दुल कलाम हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व होते.
यावेळी डॉ. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी मा नगरसेवक के. सी. शेळके, सेवा दलाचे सरवरअली मास्टर, अशोक जगधने, प्रविण नवले, सुरेश ठुबे, पुंडलिक खरे,जाकीर सय्यद सर,रियाज खान पठाण, डॉ राजेंद्र लोंढे, भगवान जाधव, सुलेमान शेख,मंगलसिंग साळुंखे, सुनील साबळे, नजीर भाई शेख, बुऱ्हाणभाई शेख, नजीर जहागीरदार, सनी मंडलिक, रितेश चव्हाणके, जाफर शहा, संजय गोसावी, विशाल साळवे, गोपाल भोसले, सागर दुपाटी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Total Users : 630469