लोणी (जनता आवाज वृत्तसेवा):- पद्मश्री मारुती चितमपल्ली याच्या निधनान एक निसर्ग पूजक आपण गमावला असून, आपल्या व्यासंगाला लेखनाची जोड देवून साहीत्याच्या माध्यमातून निसर्ग लोकांपर्यंत पोहचविणारा सिध्दहस्त लेखक काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त करुन, जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्रध्दांजली वाहीली आहे.
आपल्या शोक संदेशात मंत्री विखे पाटील यांनी म्हटले आहे की, मारुती चितमपल्ली यांनी आयुष्यभर वन, वन्यजीव व्यवस्थापन, वन्य प्राणी आणि पक्षीजगता विषयी संशोधन करण्यात प्रत्येक क्षण वेचला. शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतरही स्वस्थ न बसता निसर्ग संपन्नतेचा अभ्यास करण्यात मोठे योगदान दिल्यामुळेच त्यांनी शब्दबध्द केलेल्या निसर्गाचे वर्णन साहीत्याच्या माध्यमातून वाचकांसमोर आले.
पाच लाख किलो मीटरचा प्रवास आणि विविध १३ भाषांचे ज्ञान अवगत असलेल्या मारुती चितमपल्ली यांच्यातील लेखकाने साहीत्य विश्वाला २५ हून अधिक पुस्तकांची भेट दिली. आपल्यातील व्यासंगाला लेखनाची जोड देवून निसर्ग लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शेवटपर्यंत काम केले. यासर्व कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारने पद्मश्री पुरस्कारने त्यांचा केलेला सन्मान राज्यासाठी अभिमानास्पद ठरला.
पद्मश्री मारुती चितमपल्ली यांच्या निधनान निसर्गप्रेमी साहीत्यीक आपण गमावला असून, कधी न भरुन येणारी हानी झाली असल्याची भावना व्यक्त करुन, मंत्री विखे पाटील यांनी श्रध्दांजली वाहीली आहे.