श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):- श्रीरामपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याचे भूमिपूजन छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात सदर शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा नेहरू भाजी मंडई येथे स्थापित का करण्यात आला असा सवाल आ. हेमंत ओगले यांनी विधिमंडळामध्ये चर्चेदरम्यान उपस्थित केला.
यावेळी आ. ओगले म्हणाले की, सबंध श्रीरामपूर वासियांची गेल्या अनेक वर्षापासून ची इच्छा होती की छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हा छत्रपती शिवाजी महाराज चौकातच बसवावा त्या अनुषंगाने गेल्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज चौकात अनेक मान्यवरांच्या हस्ते सदर ठिकाणी भूमिपूजन देखील करण्यात आले परंतु अचानकपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची जागा बदलून नेहरु भाजी मंडई मध्ये महाराजांचा पुतळा घाईघाईत बसविण्यात आला या विरोधात अनेक संघटनांनी आंदोलन देखील केलेत तसेच महाराजांचा पुतळा हा छत्रपती शिवाजी महाराज चौकातच व्हावा याकरिता मोठ्या प्रमाणावर स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये जवळपास 55 हजार नागरिकांनी सहभाग नोंदवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हा छत्रपती शिवाजी महाराज चौकातच बसवावा यासाठी सह्या केल्या आहेत.
श्रीरामपूर तालुक्याचे भाग्यविधाते माजी आमदार स्वर्गीय जयंतराव ससाणे यांच्या कार्यकाळातच छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा तयार झाले होते. जर नेहरू भाजी मंडई समोरच छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवायचा असता तर गेल्या दहा वर्षांपूर्वीच सदर स्मारक त्या ठिकाणी तयार झाले असते परंतु समस्त श्रीरामपूरवासियायांची इच्छा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हा छत्रपती शिवाजी महाराज चौकातच स्थापित व्हावा.
महापुरुषांचे पुतळे, स्मारके यामध्ये कोणतेही राजकारण न करता नागरिकांची अस्मिता लक्षात घेऊन पहिल्या दिवसापासून आपण या विषयात आवाज उठवत आहोत असे देखील आ. हेमंत ओगले यांनी म्हटले आहे.
महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा देखील तयार असून फक्त वनविभागाच्या ना हरकत दाखल्यासाठी सदरचा प्रश्न प्रलंबित आहे तरी आपल्या स्तरावरून याबाबत संबंधितांना आदेश देऊन वनविभागाचे ना हरकत प्रमाणपत्र देण्याबाबत सूचना द्याव्यात अशी देखील मागणी आ. हेमंत ओगले यांनी केली आहे.