मुंबई (जनता आवाज वृत्तसेवा):-सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून समाज कल्याण अधिकारी (गट-ब) पदावर निवड झालेल्या २२ अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमास सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट उपस्थित होते.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाने आपल्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. शासनामध्ये अधिकारी म्हणून काम करत असताना जनतेची सेवा प्रामाणिकपणे करावी. शासकीय सेवेच्या माध्यमातून जनसेवेचे कार्य आपल्या हातून घडावे, असा दृष्टीकोन बाळगण्याचे आवाहन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी नवनियुक्त अधिकाऱ्यांना केले.
या कार्यक्रमास राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, समाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक प्रेरणा देशभ्रतार, बार्टीचे महासंचालक सुनील वारे तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.