spot_img
spot_img

रक्षक दलाच्या सतर्कतेमुळे एटीएमची चोरी टळली आ. सत्यजीत तांबेंच्या मार्गदर्शनाखाली रक्षक दलाची चोख कामगिरी 

संगमनेर (जनता आवाज वृत्तसेवा):- संगमनेर नगरपरिषदेच्या रक्षक दलाने पुन्हा एकदा आपली सतर्कता सिद्ध करत मध्यरात्री घडलेला एटीएम तोडफोडीचा प्रकार उघडकीस आणला. आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या व नगराध्यक्षा डॉ.मैथिली तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या रक्षक दलाच्या तातडीच्या हालचालीमुळे हा प्रकार लगेच समोर आला असून पुढील तपासाला मदत झाली आहे.

दि.९ मे रोजी रात्री साधारण १ वाजण्याच्या सुमारास रक्षक दलाची गाडी शहरात नियमित राऊंडवर होती. त्यावेळी नगरपालिका गेटसमोरील सेंट्रल बँक ऑफ इंडिया एटीएममध्ये एक संशयित व्यक्ती असल्याचा कॉल रक्षक दलाला प्राप्त झाला. विशेष म्हणजे एटीएमची लाईट बंद असल्याची शंका वर्तवण्यात आली. त्यामुळे प्रकार संशयास्पद वाटताच रक्षक दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

रक्षक दल घटनास्थळी पोहोचले असता संबंधित व्यक्ती तेथे आढळून आली नाही. मात्र एटीएमची पाहणी केली असता मशीनच्या डिस्प्लेची तोडफोड झालेली दिसून आली. एटीएमचे काही भाग तुटून खाली पडलेले होते. त्यामुळे हा प्रकार गंभीर असल्याचे लक्षात येताच रक्षक दलाने संपूर्ण परिसराची पाहणी सुरू केली.

याचवेळी एटीएमच्या १५ ते २० फुटाच्या अंतरावर २० वर्षांचा एक युवक बसलेला दिसून आला. संशयाच्या आधारे त्याची चौकशी करण्यात आली. मात्र “मी आत्ताच येथे आलो असून मला काहीच माहिती नाही,” असे त्याने सांगितले. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून रक्षक दलाने त्याला तेथेच थांबवत तातडीने संगमनेर पोलिसांशी संपर्क साधला.

रक्षक दलाने अतिरिक्त पोलीस निरीक्षक विजय माळी यांना घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या संगमनेर शाखा व्यवस्थापकांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. माहिती देताच सदर बँकेच्या कर्मचारी शांता धाडगे मॅडम यांनी घटनास्थळी उपस्थित राहत एटीएम ची पाहणी केली. याबाबत पुढील तपासाची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून रक्षक दल आणि पोलीस कर्मचारी बराच वेळ घटनास्थळी तैनात होते.

अवघ्या काही दिवसांपूर्वी स्थापन झालेले संगमनेर नगरपरिषदेचे रक्षक दल शहरात नियमित गस्त घालत असून विविध घटनांमध्ये तत्परतेने कारवाई करत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये या दलाबद्दल विश्वास वाढत असून शहरात सुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे.

 

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ‘रक्षक दल’ सतर्क –

लोकनेते बाळासाहेब थोरात व डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर सेवा समितीने एकहाती विजय मिळवला असून विविध विकासकामांची घौडदौड सध्या पाहायला मिळत आहे. आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेले रक्षक दल शहरातील संशयास्पद हालचाली, महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न, चोरीचे प्रकार तसेच रात्रीच्या गस्तीसाठी सक्रियपणे काम करत आहे. नागरिकांनी कोणतीही संशयास्पद घटना आढळल्यास तातडीने रक्षक दलाशी 9067273273 या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन देखील नगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

पोलिसांनाही ‘रक्षक दल’ ची मोठी मदत – 

शहरात रक्षक दल सक्रिय झाल्यानंतर पोलिसांवरील ताण बऱ्याच प्रमाणात कमी झाल्याचे बोलले जात आहे. अनेक घटनांमध्ये रक्षक दल प्रथम घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणत असल्याने पोलिसांना तपास आणि पुढील कारवाईसाठी मोठी मदत होत आहे. विशेषतः रात्रीच्या गस्तीमध्ये रक्षक दल महत्त्वाची भूमिका बजावत असल्याची चर्चा देखील शहरात सुरू झाली आहे.

 

 

 

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!