अहिल्यानगर(जनता आवाज वृत्तसेवा): – देशभर गाजत असलेल्या भोंदू बाबा अशोक खरात संदर्भातील न्यायालयीन खटल्यांमध्ये सरकारची बाजू मांडण्यासाठी येथील नामवंत फौजदारी वकील ॲड. परिमल फळे यांची सरकारने सहायक विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक केली आहे.
या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून राज्य सरकारने ॲड. उज्ज्वल निकम यांची नेमणूक केली आहे. त्यांना साह्य करण्यासाठी ॲड. परिमल फळे यांची नियुक्ती झाली आहे. ॲड. उज्ज्वल निकम यांची खरात प्रकरणात विशेष सरकारी वकील व ॲड. परिमल फळे यांची सहायक विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्यात येत असल्याबाबतचे नोटिफिकेशन राज्य सरकारच्या विधी व न्याय खात्याने गुरुवारी ( ता. ११ जून २०२६) रोजी जारी केले. राज्य सरकारच्या वतीने विधी व न्याय खात्याचे कक्ष अधिकारी राजेश मांजरेकर यांनी सदरचे नोटिफिकेशन प्रसिद्ध केले आहे.
राज्यभर गाजलेले राहुरी येथील आढाव वकील दामप्त्य हत्या प्रकरण तसेच नेवासे येथील ॲड. रियाज पठाण हत्या प्रकरण या दोन्ही गाजलेल्या खटल्यात सरकारतर्फे ॲड. उज्ज्वल निकम व ॲड. परिमल फळे ही जोडीच काम पहात आहे. आता बहुचर्चित खरात प्रकरणातही याच जोडीची नेमणूक सरकारने केली आहे. याशिवाय अहिल्यानगर जिल्ह्यातील बहुचर्चित रेखा जरे खून प्रकरणासह गाजलेल्या विविध खटल्यात ॲड. परिमल फळे हे आरोपींतर्फे बाजू मांडीत आहेत.



