श्रीरामपूर ( जनता आवाज वृत्तसेवा):- श्रीरामपूर-वैजापूर मार्गावरील नाऊर-हरेगाव रस्त्यावरील धोकादायक वळणावर बुधवारी झालेल्या भीषण अपघातात राहुरी तालुक्यातील गडदे आखाडा येथील २६ वर्षीय प्रशांत विटनोर यांचा मृत्यू झाला, तर दादासाहेब कोळसे गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, धोकादायक वळणाचा अंदाज न आल्याने चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर भरधाव बुलेट रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन जोरात आदळली. या भीषण धडकेत दोन्ही युवकांच्या डोक्याला व तोंडाला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला.
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना श्रीरामपूर येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना प्रशांत विटनोर यांची प्राणज्योत मालवली. दादासाहेब कोळसे यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती लक्षात ठेवून वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
या अपघातात बुलेटचेही मोठे नुकसान झाले. अपघातामुळे काही काळ श्रीरामपूर-वैजापूर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून धोकादायक वळणावर सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.




Total Users : 603935