श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा) :– शहर व तालुक्यातील वीजपुरवठ्याच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी आयोजित बैठकीत महावितरणच्या एका वायरमनला आमदार हेमंत ओगले यांच्या अंगरक्षकाने कानशिलात लगावल्याचा आरोप संबंधित कर्मचाऱ्याने केला आहे. या घटनेमुळे बैठकीत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
शहर व ग्रामीण भागातील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, कमी दाबाने वीज मिळणे तसेच इतर तांत्रिक अडचणींबाबत नागरिकांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी आमदार हेमंत ओगले यांनी नगर परिषदेत महावितरणचे अधिकारी-कर्मचारी, नागरिक आणि लोकप्रतिनिधींची बैठक आयोजित केली होती. बैठकीत अनेक नागरिकांनी महावितरणच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत विविध प्रश्न उपस्थित केले.
यावेळी हरेगाव येथील मतमाऊली यात्रेदरम्यान झालेल्या वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रकारावरही चर्चा झाली. या विषयावर संबंधित वायरमन म्हणून पंकज अशोक खरात हे स्पष्टीकरण देण्यासाठी पुढे आले असता, आमदारांच्या अंगरक्षकाने त्यांच्या कानशिलात लगावल्याचा आरोप खरात यांनी माध्यमांशी बोलताना केला.
या बैठकीस नगराध्यक्ष करण ससाणे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर, शहर व तालुक्यातील कार्यकर्ते, नगरसेवक तसेच महावितरणचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.




Total Users : 639493