लोणी, दि.२३ (जनता आवाज वृत्तसेवा):-पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंती दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या साहित्य पुरस्कार वितरण सोहळ्यास देशाचे संरक्षण मंत्री ना.राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांची लाभलेली उपस्थिती ही प्रवरा परिवाराच्या दृष्टीने महत्वपूर्ण असल्याने या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी योगदान देण्याचे आवाहन खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी केले.
कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत आज प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन त्यांनी सांगितले. याप्रसंगी माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, डॉ.विखे पाटील कारखान्याचे चेअरमन कैलास तांबे, प्रवरा बॅकेचे चेअरमन डॉ.भास्करराव खर्डे पाटील, व्हा.चेअरमन मच्छिंद्र थेटे, जेष्ठनेते आण्णासाहेब भोसले पाटील, दिपक शिरसाठ, अॅड.भास्करराव दिघे यांच्यासह विविध संस्थाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
मागील साहित्य पुरस्कार वितरणासाठी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना निमंत्रित केले होते. यंदा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आपल्याकडे येते आहे ही प्रवरा परिवराच्या दृष्टीने अतिशय भूषणावह बाब असून, हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गावपातळीवर सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंती दिनाच्या निमित्ताने होत असलेला भव्यदिव्य कार्यक्रमामुळे साहित्य पुरस्काराची उंची वाढणार आहे. या परिसराने सातत्याने असे मोठे कार्यक्रम आयोजित करुन, देशपातळीवरील नेते निमंत्रीत करुन, या भागातील काम देशामध्ये नेण्याचा यशस्वी प्रयत्न केला असल्याचे त्यांनी सांगितले.



