श्रीरामपूर,( जनता आवाज वृत्तसेवा ):– हरेगाव येथील घटना अमानुष असून ती काळीमा फासणारी आहे. मुळात एवढे धाडस कसे होते. यांना सरकारची भीती वाटते की नाही, पोलीस विभाग काय करतो असा प्रश्न उपस्थित करून हे सरकारचे अपयश असल्याचा आरोप आमदार लहू कानडे यांनी केला.
ज्यांनी मुलांना मारहाण केली त्या कुटुंबाविरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यातील किती प्रकरणांची चौकशी करण्यात आली व आरोपपत्र दाखल करण्यात आले हे पाहावे लागेल. हे आधीच केले असते तर आजची घटना झाली नसती. यातील काही मुले अल्पवयीन असून आरोपींविरोधात पोक्सोअंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी आमदार कानडे यांनी केली. ह्या लोकांनी घरासमोर हरणे पाळल्याचे व्हिडीओत दिसत आहेत. त्यांच्याविरुद्ध वन्य प्राणी कायद्याअंतर्गत अजामीनपात्र गुन्हा दाखल करायला हवा होता. त्यांच्या अशा वागण्याने आम्ही काहीही करू शकतो, अशी प्रतिमा निर्माण झाली. त्यातूनच मध्यंतरी मंदिराच्या कामाला विरोध केला गेला. तसेच येथील बाजारपेठेच्या जागेवरही त्यांनी हक्क सांगितल्याची माहिती समोर आली आहे. हे कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे याची चौकशी व्हायला हवी, या संदर्भात पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या कानावर या गोष्टी घातल्या आहेत. पुढील आठवड्यात याठिकाणी मतमाऊलीची यात्रा भरत आहे. यासाठी पाच ते सहा लाख भाविक हजेरी लावतात. त्यामुळे हरेगाव शांत होण्याची आवश्यकता आहे. आणि ते तेव्हाच होईल ज्यावेळी सर्व गुन्हेगारांना अटक करून त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे केली आहे.



