नेवासा फाटा( जनता आवाज वृत्तसेवा ):- नेवासा तालुक्यातील गळनिंब गावच्या सरपंचपदी प्रहारचे जिल्हा संघटक बाळासाहेब खर्जुले यांच्या पत्नी सौ.कुसुम खर्जुले यांची बिनविरोध निवड झाली यानंतर त्यांनी कुठलाही पूजा पाठ अथवा नेता यांच्या उपस्थितीत पदभार न स्विकारता स्वतः रक्तदान करून सरपंच पदाचा कार्यभार स्विकारुन समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.
यावेळी बोलतांना त्या म्हणाल्या की, माझे पती नामदार बच्चुभाऊ कडू यांच्या विचाराने राजकारण करतात बच्चुभाऊ म्हणजे रुग्णसेवा करणारे आणि स्वतः रक्तदान करणारे महाराष्ट्रातील एकमेव नेते आहेत. महिला रक्तदान करू शकतात हा संदेश देण्यासाठी मी आज हा निर्णय घेतलेला आहे. यावेळी महीला सरपंचांचे पती बाळासाहेब खर्जुले यांनी देखील रक्तदान केले.
यावेळी बाळासाहेब खर्जुले म्हणाले की,सामान्य व्यक्तीच्या घरात सरपंच पद दिल्याने जनसामान्य व्यक्तीच्या दारापर्यंत सर्व ग्रामपंचायत योजना नेणार आहोत यामध्ये पक्षभेद बाजूला ठेवून सर्वांना सोबत घेऊन कामकाज करणार आहोत गळनिंब येथील माजी जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब उर्फ पिंटू शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत राहू असे त्यांनी यावेळी सांगितले.
नेवासा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुरेश पाटेकर यांनी गावातील विविध कामांना भेटी देऊन सांगितले की, सर्व चालू असलेली कामे समाधानकारक आहेत पंचायत समिती मार्फत गांव आदर्श होण्यासाठी सर्व प्रशासकीय सहाय्य करू महिला सरपंच कुसुम खर्जुले यांनी जे रक्तदान केले ते म्हणजे आपल्या नेवासा तालुक्यासाठी आदर्श उदाहरण आहे. कार्यक्रमाला उपस्थित प्रहारचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पोटे यावेळी म्हणाले की,नामदार बच्चुभाऊ कडू यांच्या विचाराने आणि सहकार्याने जी काही गरज लागेल त्या गरजेच्या वेळी संपूर्ण प्रहार टीम उभी राहील असे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रहारचे जिल्हा कायदेशीर सल्लागार विधिज्ञ पांडुरंग औताडे यांनी केले. कार्यक्रमाला रक्तदानासाठी नेवासा येथील डॉक्टर निलेश लोखंडे यांचे सहकारी व अर्पण ब्लड बँकेचे सर्व कर्मचारी यांनी रक्तदानासाठी विशेष परिश्रम घेतले यावेळी उपस्थित सर्व नागरिक, महिला व ग्रामसेवक तसेच कर्मचारी व तरुणवर्ग यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होता.



