लोणी, दि.४( जनता आवाज वृत्तसेवा):- सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या १२३ व्या जयंती दिनाचे औचित्य साधून देण्यात येणा-या राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांची घोषणा पुरस्कार निवड समितीने केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील जेष्ठ विचारवंत व उत्कृष्ठ समिक्षक निशिकांत ठकार यांना यंदाचा पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील साहित्य जीवन गौरव पुरस्कार देवून गौरविण्यात येणार असून, राज्यस्तरीय उत्कृष्ठ साहित्य पुरस्कार पुणे येथील डॉ.शैलजा बापट यांना आणि राज्यस्तरीय कलागौरव पुरस्कार तमाशा कलावंत वसंत अवसरीकर यांना देण्यात येणार असल्याची माहीती पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ.रावसाहेब कसबे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय साहित्य जीवन गौरव पुरस्कार जेष्ठ विचारवंत व उत्कृष्ठ समिक्षक निशिकांत ठकार यांना जाहीर 30 ऑगस्ट 2023 रोजी होणार पुरस्काराचे वितरण
यावर्षीचा पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय विशेष साहित्य पुरस्कार विश्वास वसेकर यांच्या कविता संग्रहास देण्यात येणार असून, पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील अहमदनगर जिल्हा विशेष साहित्य पुरस्कार विकास पवार यांना जाहिर झाला आहे. राज्यस्तरीय प्रबोधन पुरस्कार समाज प्रबोधन पत्रिकेचे अशोक चौसाळकर यांना तर पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय नाट्यसेवा पुरस्कार जळगाव येथील शंभू पाटील यांना देण्यात येणार असल्याची माहिती डॉ.रावसाहेब कसबे यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी पुरस्कार निवड समितीचे निमंत्रक प्रा.डॉ.राजेंद्र सलालकर उपस्थित होते.
सहकाळ चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून दरवर्षी राज्यातील साहित्यीक, कवी, नाट्य कलावंत आणि समाज प्रबोधनकारांना पुरस्कार देवून गौरविण्यात येते. यंदाचे हे पुरस्काराचे ३३ वे वर्ष असून, ३० ऑगस्ट २०२३ रोजी पद्मश्री विखे पाटील यांच्या जयंती दिनी ९७ व्या अखील भारतीय साहित्य संमेलानाचे नियोजित अध्यक्ष रविंद्र शोभणे यांच्या उपस्थितीत या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार जाहिर झालेले प्रा.निशिकांत ठकार हे उत्कृष्ठ समिक्षक असून, आजपर्यंत त्यांनी हिंदी साहित्य मराठीत अनुवादीत करण्यासाठी मोलाचे परिश्रम घेतले आहे. त्यांच्या साहित्य सेवेचा सन्मान व्हावा म्हणून पुरस्कार निवड समितीने यंदाचा साहित्य जीवन गौवर पुरस्कार देवून सन्मानित करण्याचा निर्णय घेतला असून, रुपये १ लाख आणि स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
डॉ.शैलजा बापट या मध्ययुगीन साहित्याच्या अभ्सासक असून, त्यांनी चक्रधरांच्या तत्वनिरुपणाचा आणि व्याख्यानांचा सखोल अभ्यास केला आहे. मध्ययुगीन वाडमयाचा अभ्यास करणारा आणि मानवी जीवनोध्दाराच्या प्रेरणेचा शोध घेणा-या त्यांच्या ग्रंथास रुपये ५१ हजार आणि स्मृतीचिन्ह देवून सन्मानित करण्यात येणार असून, कवी विश्वास वसेकर यांची मुल्यत्र्यची कवीता संग्रहास २५ हजार रुपये रोख आणि स्मृतीचिन्ह देवून सन्मानित करण्यात येणार आहे. शोषणमुक्त नवभारत निर्माण करण्यासाठी आणि समाजाला मुल्यत्र्ययीच्या उदात्त ध्येयाकडे घेवून जाणारी त्यांची कवीता ही पद्मश्री विखे पाटील यांच्या विचारांशी संवादी ठरत असल्याने त्यांचा गौरव करण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.
नाट्यसेवा पुरस्कार जाहिर झालेले जळगाव येथील शंभू पाटील यांनी मराठी नाट्य परंपरा थेट खेड्यापर्यंत जीवंत राहण्यास मदत केली. एल्गार, हा वेडा माणूस शोधतोय, अभिशाप, धर्मसत्य इत्यादी नाटकांचे लेखनही त्यांनी केले असून, साहित्यीक, सांस्कृतीक आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रीय योगदानाचा गौरव म्हणून २५ हजार रुपये रोख आणि स्मृतीचिन्ह देवन त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
अहमदनगर जिल्हा साहित्य पुरस्कार श्रीरामपूर येथील डॉ.शिरीष लांडगे यांच्या श्रीज्ञानेश्वर दर्शन या ग्रंथाच्या संपादनास जाहिर झाला असून, दोन खंडातील हा ग्रंथ ज्ञानेश्वरांविषयी श्रध्दा आणि चिक्तीसा, विध्वत्ता आणि रसिकता, धर्म आणि तत्वज्ञान अशा भूमिकांचे दर्शन वाचकांना घडवित असल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले.
अहमदनगर जिल्हा विशेष साहित्य पुरस्कार या वर्षी विकास पवार यांच्या भंडारदरा धरण शतकपूर्ती प्रवास या पुस्तकास देण्यात येणार असून, प्रवरा परिसर साहित्य पुरस्कार डॉ.अशोक शिंदे यांच्या ते दिवस आठवून बघ या कविता संग्रहास आणि पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील समाज प्रबोधन पुरस्कार समाज प्रबोधन पत्रीकेच्या संपादकांना यावर्षी देण्यात येवून सन्मानित येणार असल्याचे डॉ.रावसाहेब कसबे यांनी सांगितले.