अमरावती (जनता आवाज वृत्तसेवा):- अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. हे सरकार अतिशय असंवेदनशील आहे. या सरकारनं शेतकऱ्यांचं कंबरड मोडण्याचा घाट घातला आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे. दरम्यान नांदेडमध्ये झालेल्या रुग्णांच्या मृत्यूवरून देखील त्यांनी हल्लाबोल केला आहे. औषधांचा गोंधळ ही महाराष्ट्र सरकारची चुकी आहे. ज्या आईन आपलं मूल गमावलं आहे, त्या आईला सरकारने विचारावं तिचं दुःख काय आहे? संबंधित मंत्र्यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे, अशी मागणी सुळे यांनी केली आहे.
अमरावतीमध्ये महाविकास आघाडीकडून लोकसभेचा उमेदवार कोण असणार? यावर देखील सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुढील आठ-दहा दिवसांत महाविकास आघाडीची बैठक होणार आहे, त्यानंतर अमरावती लोकसभेच्या उमेदवारी संदर्भात स्पष्ट होईल, असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच जर प्रियंका गांधी या महाराष्ट्रातून निवडणूक लढवत असतील तर त्यांच मी स्वागतच करते. आम्हाला त्याचा आनंद होईल असं वक्तव्यही सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.



