लोणी दि.११( जनता आवाज वृत्तसेवा ):-प्रत्येक विद्यार्थ्यांच्या जीवनात परीक्षा हा अतिशय संवेदनशील भाग असतो. कोणत्याही वर्गाची परीक्षा देताना विद्यार्थी काहीसा ताण तणावाचे जीवन जगतो असे नेहमी जाणवते. आजच्या स्पर्धेच्या युगात खूप मोठी स्पर्धा निर्माण झालेली आहे. विशेष करून महाविद्यालयीन परीक्षा फार महत्त्वाची असते. दिवसेंदिवस विद्यापीठीय परीक्षा कामकाजावर मोठ्या प्रमाणावर ताण येताना दिसत आहे. यासाठी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने आज पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या वतीने माहाविद्यालयीन प्राचार्य व महाविद्यालयीन परीक्षा अधिकारी अभिमुखता कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी उद्घाटक म्हणून अहमदनगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील बोलत होत्या. यावेळी त्यांनी परीक्षा विभागाचे महत्त्व विशद करून; महाविद्यालय व विद्यापीठ यांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे असे सांगितले.
यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ महेश काकडे, उपकुलसचिव डॉ प्रसाद कुलकर्णी, डॉ. गोकुळदास लोखंडे व त्यांचे सहकारी उपस्थित होते. डॉ महेश काकडे यांनी आपल्या मार्गदर्शनातून परीक्षा कामकाज व परीक्षा विभागातील कामकाजाचे स्वरूप विशद करून प्राचार्य व प्राध्यापक यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा विचार करून मूल्यमापन करावे.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रदीप दिघे यांनी स्वागत केले.




