नगर (जनता आवाज वृत्तसेवा):- रोजगारक्षमता आणि आर्थिक वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य विकास महत्वाचा असतो, हे उद्दिष्ट समोर ठेवून नेप्ती येथील छत्रपती अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये ‘एम्प्लॉयबिलिटी इंहान्समेंट अँड युथ लाईव्हलीहूड प्रोग्राम’ ही ६ दिवसांची कार्यशाळा आयोजित केली आहे. १६ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर पर्यंत कालावधी असलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडले.
महिंद्रा प्राइड क्लास रूम प्रोजेक्ट नंदी फाउंडेशन आणि महाविद्यालयातील संगणक अभियांत्रिकी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या खास कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थिनींसाठी करण्यात आले. औद्योगिक क्रांतीने कौशल्यांची परिभाषा आणि रोजगार क्षमता मोठ्या प्रमाणात बदलली आहे आणि म्हणूनच या क्षेत्रातील विविध डिजिटल कौशल्यांची माहिती आपण घेतली पाहिजे, असे वक्तव्य कार्यक्रमास लाभलेले प्रमुख पाहुणे श्री. चिन्मय अभंगराव यांनी केले. विद्यार्थिनींना त्यांचे मूळ ज्ञान, कौषल्य आणि व्यवसाय निर्मितीसाठी सक्षम बनविणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. या कार्यशाळेमध्ये विद्यार्थिनींसाठी संभाषण कौशल्य, वेळेचे योग्य नियोजन, रोजगार निर्मिती, मुलाखतीचे तंत्र, प्रकल्प सादरीकरण, काही प्रात्यक्षिके, जिवांकौशल्य विकास, इत्यादी विषयी माहिती पुढील ६ दिवसांमध्ये सांगण्यात येणार आहे.
शिक्षित विद्यार्थीवर्गातील बेरोजगारी कमी करण्यासाठी त्यांना उपयुक्त औद्योगिक रोजगारासाठी सुसज्ज करणे, ही काळाची गरज असून असे कार्यक्रम यापुढेही महाविद्यालय आयोजित करत राहील अशी ग्वाही महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाय. आर. खर्डे सर यांनी दिली. कार्यक्रमाचे नियोजन संगणक अभियांत्रिकी विभागाच्या प्रमुख प्राध्यापिका व्ही. व्ही. जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापिका एस. आर. पवार आणि सहभागी प्राध्यापकांनी केले. कार्यक्रमास सिव्हील विभागाचे प्रमुख प्रा. पी. जी. निकम, प्रथम वर्ष समन्वयक डॉ. एम. के. भोसले, ई अँड टी सी विभाग प्रमुख प्रा. एस. एम. वाळके, कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या विभाग प्रमुख प्रा. व्ही. व्ही. जगताप, मेकॅनिकल विभाग प्रमुख प्रा. ए. बी. काळे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन संगणक विभागातील प्रा. एस.आर.पवार यांनी केले.



