श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा):- नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने सरकारी सेवेतील कामाबरोबरच सामाजिक सेवा करणाऱ्या नवदुर्गांच्या कामाची दखल घेत आमदार लहू कानडे यांनी त्यांचा केलेला सन्मान सोहळा कौतुकास्पद असल्याचे प्रतीपादन रयत शिक्षण संस्थेच्या मँनेजिंग कौन्सिल सदस्या मीनाताई जगधने यांनी केले.
महर्षी प्रतिष्ठान व लोकहक्क फौंडेशनच्यावतीने स्व. गोविंदराव आदिक सभागृहात आयोजित केलेल्या सन्मान नारी शक्तीचा या कार्यक्रमप्रसंगी अध्यक्षपदावरून त्या बोलत होत्या. संगमनेरच्या माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या हस्ते शासनाच्या विविध विभागात सेवाभावी काम करणाऱ्या सुमारे एक हजार महिलांचा साडी व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी आमदार लहु कानडे, माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, अंकुश कानडे, कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे, तालुकाध्य्क्ष अरुण पाटील नाईक, माजी नगरसेविका समीना शेख, हेमा गुलाटी, महर्षी प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी नगरसेवक अशोक कानडे, विष्णुपंत खंडागळे, संग्राम कानडे, कविताताई लहू कानडे, जिजाबाई अंकुश कानडे, सुनिता अशोक कानडे, डॉ. जोत्स्ना संग्राम कानडे व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी बोलताना मीनाताई म्हणाल्या कि, आ. कानडे हे साहित्यिक, कवी आहेत. त्यांच्यातील संवेदनशील मनाने सरकारी नोकरीबरोबरच समाजात सेवाभावी काम करणाऱ्या, समाजात योगदान देणाऱ्या महिलांच्या कामाची दाखल घेतली. नवरात्रौत्सवानिमित्त दांडियासारखे कार्यक्रम घेण्याऐवजी या नारी शक्तीचा सन्मान करून आगळा वेगळा उपक्रम राबविला, ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे.
दुर्गाताई तांबे म्हणाल्या, पूर्वी महिलांना शिक्षण नव्हते, त्यांना सती जावे लागे, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज यांनी महिलांना यातून बाहेर काढण्यासाठी कष्ट घेतला, त्याग केला. म्हणूनच आज या महिला येथे उपस्थित आहेत. ताणतणावात समाजात नोकरीसह घरकाम करून या महीला काम करतात. हे करतान त्यांना तारेवरची कसरत करावी लागते, करोना काळात या महिलांनी केलेले काम वाखाणण्याजोगे आहे, हे काम करणे साधे नव्हते, ज्यांनी खुर्चीवर बसविले त्यांचे स्मरण ठेवले पाहिजे, या भावनेतून आ. कानडे यांनी महिलांचा सन्मान केल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, समीना शेख, हेमा गुलाटी यांनी मनोगत व्यक्त केले.
आ. कानडे म्हणाले, समाजात माणूस म्हणून जगायचे असेल तर बोलले पाहिजे, कुणाची तरी गुलामगिरी करण्याचे जीवन झुगारून दिले पाहिजे. अंगणवाडी ताई, आशा वर्कर्स, बचतगट प्रवर्तक, कृषी सखी व बँक सखी, आरोग्यसेविका, नर्सेस, शिक्षिका आणि प्राध्यापिका, महिला वकील, डॉक्टर्स, सरपंच, महिला पोलीस तसेच श्रीरामपूर व देवळाली प्रवरा नगरपरिषद हद्दीतील महिला सफाई कर्मचारी या सर्व माता भगिनी घर सांभाळून समाजात सेवाभावी काम करतात. त्यांच्या कामाची दखल म्हणून मोठ्या भावाकडून बहिणीला छोटीशी भेट दिली आहे. त्यांना तटपुंजे मानधन आहे. त्यांचे अनेक प्रश्न आहेत. त्यांच्या प्रश्नात लक्ष घालून ते सोडविण्याचा आपला प्रयत्न आहे.
कॉंग्रेसचे तालुकाध्य्क्ष अरुण पाटील नाईक यांनी प्रास्ताविक केले. महर्षी प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी नगरसेवक अशोक कानडे यांनी आभार मानले. यावेळी अमृत काका धुमाळ, कॉंग्रेसचे शहराध्य्क्ष प्रविण काळे, सतीश बोर्डे, सचिन जगताप, सुरेश पवार, हरिभाऊ बनसोडे, अशोक भोसले, राजेंद्र औताडे, आबा पवार, भैय्या शहा, रमेश आव्हाड, अमोल आदिक, रविंद्र आमले, दिनकर बनसोडे, दीपक निंबाळकर, अजय खिलारी, श्री. देशमुख, अनिल बिडे, मधुकर आमले, अजिंक्य उंडे, आशिष शिंदे, कल्पेश माने, सम्राट माळवदे, प्रतिक कांबळे, निखील कांबळे, रवी भांबरे, अक्षय नाईक आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.



