संगमनेर( जनता आवाज वृत्तसेवा):-दूध उत्पादक शेतक-यांबद्दल एवढाच कळवळा असेल तर, खा.निलेश लंके यांनी आपल्या आंदोलनाची सुरूवात संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघापासून करावी असे थेट आव्हान भाजपा विधानसभा प्रमुख अमोल खताळ पाटील यांच्यासह दूध उत्पादक शेतक-यांनी केले आहे.
या संदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हणले आहे की, राज्यात महायुती सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना पाच रुपयाचे अनुदान देण्याची योजना सुरू करून त्याची अंमलबजावणी केली. संगमनेर तालुक्यातील सुमारे २३ हजार ३०४ शेतक-यांना १६ कोटी १५ लाख ७७ हजार २५५ इतक्या रुपयांचे अनुदान शेतक-यांच्या खात्यात वर्ग झाले. महाविकास आघाडी सरकारला जमले नाही ते महायुती सरकारने करून दाखवले. पण या अनुदान योजनेत अडथळा आणण्याचे मोठे काम दूध संघा कडूनच झाले. एकीकडे दूधाला भाव नाही म्हणून सरकारच्या विरोधात ओरडणारे खा.निलेश लंके मात्र दूध उत्पादक शेतक-यांना मदत करण्याचे आव्हान दुध संघ चालविणा-या माजी मंत्री आ.बाळासाहेब थोरातांना सांगूही शकले नाहीत हे दुर्दैव आहे. सरकार कडून अपेक्षा व्यक्त करताना दूध संघांनीही शेतक-यांच्या पाठीशी उभे राहण्याची मागणी खरे तर खा.लंके यांनीकरायला हवी होती. परंतू दूध उत्पादक शेतक-यांवरचे बेगडी प्रेमच त्याचे आता स्पष्ट होत आहे.
वास्तविक सरकारने पाच रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय करताना दूध संघानी सुध्दा एक पाऊल पुढे टाकून मदत करणे गरजेचे होते. कारण एकीकडे दूध उत्पादक शेतकऱ्यांना भाव नाही आशी ओरड करणारेच दूध संघाचे चालक ग्राहकांना चढ्या भावाने दूधाची विक्री करतात. महाविकास आघाडीची आशी दुहेरी भूमिका कशी? असा सवाल अमोल खताळ पाटील यांनी व्यक्त केला.
राज्यात महायुतीच्या सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहाण्याची भूमिका घेतली. दूग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सहकारी आणि खासगी संघना दूध घालणाऱ्या शेतकऱ्यांना पाच रुपये अनुदान देण्याची योजना लागू केल्यामुळेच जिल्ह्यातील इतक्या जिल्ह्यातील ९८ हजार ८७८ शेतक-यांना ८२ कोटी ७८ लाख ९८ हजार ६४० कोटी रुपयांचे अनुदान मिळू शकले.
पण केवळ शेतकऱ्यांच्या भावनाशी खेळून त्यांच्या प्रश्नाचे राजकीय भांडवल करणा-या खा.निलेश लंके यांनी दूध धंद्याचा अभ्यास करून बोलावे.कारण संगमनेरात येवून ज्यांचे कौतुक करता त्यांनी तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना आतापर्यत किती आणि कोणती मदत केली याची माहीती घ्यायला हवी होती. दूध संघाकडून होत असलेल्या अन्यायावर सुध्दा कधीतरी बोलावे.केवळ व्यक्ति द्वेषापोटी दूध अनुदानाचे राजकारण करण्यापेक्षा दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बद्दल खरीच आत्मियता असेल तर खा.लंके यांनी आपल्या आंदोलनाची सुरूवात संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघापासून करावी असे आव्हान या पत्रकातून केले आहे.




