नेवासा फाटा( प्रतिनिधी):सुरेशनगरच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच शैलाताई उभेदळ यांना ऐन उन्हाळ्यात गावकऱ्यांची पिण्याच्या पाण्यासाठी होणारी पायपीट पाहवली नाही. गावकऱ्यांची विशेषता महिलांची होणारी पायपीट थांबवण्यासाठी त्यांनी थेट स्वतःच्या मालकीच्या विहिरीचे पाणी ग्रामपंचायतच्या विहिरीमध्ये टाकून ते परत गावाला घरोघरी पोहोचविण्याचे काम केले.
सुरेशनगर मध्ये नेहमी मार्च ,एप्रिल आणि मे या तीन महिन्यात भीषण पाणीटंचाई जाणवत असते या काळात गावातील माता भगिनी यांना रानोराण पाण्यासाठी भटकंती करावी लागते .परंतु याच काळात सुरेशनगरच्या लोकनियुक्त सरपंच शैलाताई उभेदळ यांनी गावची समस्या तात्काळ ओळखून गावाला आपल्या स्वतःच्या मालकीच्या विहिरीचे पाणी पुरविले त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे विविध स्तरातून कौतुक होत आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी सरपंच शैलाताई उभेदळ व त्यांचे पती कल्याणराव पाटील या दांपत्याचे विशेष आभार मानले.
यावेळी सरपंच शैलाताई उभेदळ बोलताना म्हणाल्या की गावचा पाणी प्रश्न महिलांना नेहमी सतावत असताना मी सरपंच असून हातावर हात धरून बसू शकत नाही म्हणूनच आज मी माझ्या आदर्श सुरेशनगर गावासाठी माझ्या स्वतःच्या विहिरीतून पाणीपुरवठा केल्यानंतर मला सुखद समाधान व आनंद झाला. गावासाठी आपण काहीतरी करू शकलो तसेच गावासाठी पाणी उपलब्ध करून देणे हे माझे प्रथम कर्तव्य असून मी गावासाठी या पलीकडेही जाऊन विविध शासकीय योजना राबवण्यासाठी कटिबद्ध आहे. गावातील जनतेने दाखवलेले एकीचे बळ व इच्छाशक्तीच्या जोरावर मी असेच गावचा विकास करत राहील असा सरपंच शैलाताई उभेदळ यांनी गावकऱ्यांना विश्वास दिला.
याप्रसंगी सरपंच शैलाताई उभेदळ व त्यांचे पती कल्याणराव उभेदळ या दांपत्याचे आभार मानण्यासाठी उपसरपंच भागचंद पाडळे, ग्रामपंचायत सदस्य नाथा बाबर ,विनोद निकाळजे, दिलीप शेटे, चंद्रभान क्षीरसागर ,सावळा शेगर, खंडू निकाळजे, देविदास खंडागळे, ग्रामसेवक के.बी. इंगळे, ग्रामपंचायत कर्मचारी अविनाश उभेदळ, अजय खंडागळे तसेच गावातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.



